युवकांनी याच वयात स्वच्छंद जगावे-अडसूळ

0
21

गडचिरोली–आजच्या सोशल मीडियाच्या जगात युवक स्वत:ला बांधून ठेवत आहे. माहिती, ज्ञान, आचार व विचार आत्मसात करून चांगल्याप्रकारे आवडीने कला, क्रीडा क्षेत्रात सहभाग घ्यावा. तारूण्यात युवकांना चांगला मार्ग निवडता आला पाहिजे, चुकीचे, अवैचारिक सामाजिक विरोध युवकांना आयुष्यातील जगण्याचा मार्ग अवघड करून देतात. त्यामुळे या वयात माहिती नसेल तर सामाजिक किंवा इतर महत्वाच्या प्रश्नांवर प्रतिक्रिया न देता फक्त अभ्यास म्हणून माहिती घ्यावी. वैचारीक परिपक्वता ही विशिष्ट कालावधीनंतर येत असते. आताच युवकांनी अशा विषयात न पडता आपल्या भविष्याचा विचार करून मनमोकळेपणाने वर्तमानात जगावे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी केले.
नेहरू युवा केंद्र गडचिरोली, राष्ट्रीय सेवा योजना गोंडवाना विद्यापीठ व स्काऊट गाईड यांनी एकत्रित युवा महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक एनएसएस डॉ. श्याम खंडारे होते. उद्घाटक जिल्हा क्रीडा अधिकारी दोंदल यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे, प्रा.शांती पाटील, विवेक कहाळे, मनोहर हेपट, डॉ. शुभांगी परशूरामकर उपस्थित होते.
डॉ. श्याम खंडारे यांनी युवकांना स्पध्रेसाठी शुभेच्छा दिल्या व जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी युवकांनी विविध स्पर्धांमधे सहभाग घेण्यासाठी आवाहन केले. ते म्हणाले, गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात क्रीडा कौशल्य आहे. आपल्याकडे विविध खेळांसाठी प्रशिक्षणे, शिबिरे आयोजित केली जातात. यामधे सहभाग घेणे आवश्यक आहे. प्रास्ताविक अमित पुंडे यांनी युवा महोत्सवाबाबत उपस्थितांना माहिती दिली.
महोत्सवात चित्रकला, कविता स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, भाषण, सामुहिक सांस्कृतिक कार्यक्रम व युवा संवाद अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देण्यात येणार आहे.