कुरखेडा- कुरखेडा- देसाईगंज मार्गावरील नाल्यावर अतिक्रमण करून केलेले पक्के बांधकाम येत्या आठ दिवसांत न हटविण्याची कार्यवाही न केल्यास तीव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कुरखेडा शहरातील विद्यानगर येथील नागरिकांना मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
कुरखेडा -वडसा मार्गावरील मुख्य नाल्यावर अतिक्रमण करून नालाबुजवून त्यावर बांधकाम करण्यात आलेला आहे. सदर बांधकाम अवैध असल्याबाबत तहसीलदारांनी प्राथमिक अहवाल नपंला पाठविला आहे. वन विभागाने आपल्या विभागामार्फत सदर जागेची चौकशी करून सदर जागा ही महसूल विभागाची सल्याच्या बाबत तहसीलदारांना कळविले आहे. परंतु, प्रत्यक्षात कुठलाही विभाग हे अतिक्रमण काढून घेण्यासाठी पुढे येत नसल्याने येथील नागरिक आता आक्रमक पवित्र घेत मोठा आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. तहसीलदार यांनी १३ सप्टेंबरला ला पत्र देवून नपंनला सदर नाल्यावर जो बांधकाम आहे तो त्यांचे हद्दीत येत असल्याने त्याचा प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमणाबाबत शहानिशा करून तसा अहवाल पाठविण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात हे अतिक्रमण काढून घ्या किंवा सदर अतिक्रमण काढून घेण्यासाठी मनुष्यबळ व इतर आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करण्या संदर्भात कुठलीही मागणी नपंला केली नसल्याने नगरपंचायतने आपली बाजू सुरक्षित करत २३ सप्टेंबरला तहसीलदार यांना शासन निर्णयाचा हवाला देत सदर जागा महसूल विभागाची असल्याने नगरपंचायत अतिक्रमण काढण्यास असर्मथ आहे व ते शासनाच्या निर्णयाचे उल्लंघन ठरेल, असा उलट पत्र तहसीलदारांना पाठविलेले आहे. सदर पत्र व्यवहाराबाबत स्थानिक नागरिकांना कुठलीही माहिती उपलब्ध न झाल्याने आक्रमक झालेले विद्यानगर येथील नागरिक थेट नपंला येथे धडकले. नगराध्यक्ष अनिता बोरकर व गटनेता आशिष काळे यांचे सोबत सदर अवैध बांधकाम व पूर परिस्थिती संदर्भात नगरपंचायतची भूमिका जाणून घेण्यासाठी चर्चा झाली. या चर्चेमध्ये नगरपंचायतने आपण अतिक्रमण काढण्यासाठी तयार आहोत, परंतु, नियमानुसार सदर जागा ही महसूल विभागाची असल्याने तहसीलदार यांनी तसे पत्र नगरपंचायत ला द्यावे, असे बोलून दाखवले. सदर जागा ही महसूल विभागाची असल्याने शासनाच्या जीआर प्रमाणे ज्या विभागाची ती जागा आहे त्यांनी कार्यवाही करणे अपेक्षित असल्याचे सांगितले. तहसीलदारानी नपं कडे अतिक्रमण काढून घेण्यासाठी मनुष्यबळ व यंत्रसामुग्रीची मागणी केली तर ती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगरपंचायतची असेल असे सांगितले.
मुख्य नाल्यावर पक्के बांधकाम करून अतिक्रमण केलेले आहेत. सदर अतिक्रमण करून केलेल्या बांधकामामुळे पावसाचे पाणी सतत साचल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. पावसाचे पाणी साचून विद्यानगर येथील नागरिकांच्या घरात पाणी घुसत आहे. सदर अतिक्रमण पाठविण्यासाठी येत्या आठ दिवसांमध्ये कार्यवाही न झाल्यास सर्व विद्यानगर वाशी अतिक्रमण हटविण्यासाठी तीव्र आंदोलन करू असा इशारा नगरपंचायत कुरखेडा देण्यात आला.