साकोली लाखनी, लाखांदूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

0
9

साकोली : खरीप हंगामामध्ये अपुर्‍या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. भंडारा जिल्ह्यातील ३७१ गावे पैसेवारीच्या निकषावरून दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली.मात्र नंतर ती गावे पुन्हा रद्द करण्यात आली. त्यामुळे शासनाने फेरविचार करून साकोली लाखनी व लाखांदूर या तिन्ही तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करून शासकीय मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे.५0 पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेल्या ३७१ गावातील शेतकरी मदतीविना राहणार आाहेत.कर्जाच्या खाईत लोटलेल्या शेतकर्‍यांना पुन्हा एकदा सुलतानी संकटाला बळी पडावे लागणार आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी कर्जाच्या खाईत लोटल्याशिवाय जातील. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करायला लागतील. हे टाळण्यासाठी जाहीर झालेली निधी तत्काळ शेतकर्‍यांना पुरविण्याची व्यवस्था शासनाने करावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे दि. ३ मार्चला उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहील असा इशाराही पत्रपरिषदेतून देण्यात आला आहे. या आशयाचे निवेदन साकोलीचे उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले यांना देण्यात आले.
या पत्रपरिषदेला अविनाश ब्राह्मणकर, डॉ.विकास गभणे, प्रदीप मासूरकर, अंगराज समरीत, नरेंद्र वाडीभस्मे, हेमकृष्ण वाडीभस्मे, राशीद कुरैशी, डॉ.विनायक मेंढे, राकेश भारकर, मदन रामटेके, दिपक चिमणकर, चंद्रकांत सारंगापुरे, होमराज कापगते, एल.टी. भावे, हेमंत भारद्वाज, बाळा बोरकर उपस्थित होते.