११ डिसेंबर ते २६ डिसेंबर  या कालावधीत जिल्ह्यात कलम ३७ लागू

0
10

 गोंदिया दि. १०: ग्रामपंचायतीच्या निवडणुका व निवडणूक निकाल तसेच  “नाताळ ख्रिसमस” सणाच्या  पार्श्वभुमीवर  जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठेत लोकांची गर्दी  वाढणार आहे. या दृष्टीकोणातून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखणे कामी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. पोलीस अधिनियम क्रमांक २२ चे कलम ३७ (१) (३) अन्वये गोंदिया जिल्हयाकरीता सार्वजनिक शांतता, सार्वजनिक  सुरक्षितता तसेच सार्वजनिक रस्त्यावर कायदा व सुव्यवस्था कायम राखणेसाठी ११ डिसेंबर २०२२ च्या ००.०१ वाजे पासून २६ डिसेंबर २०२२ च्या २४.०० वाजे पर्यंत उक्त कालावधी करीता मनाई आदेश लागू असणार आहे.

          जिल्हयात विविध पक्ष व संघटना कडून त्यांच्या प्रलंबित मागणी संबंधाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्तारोको, जेल भरो व संप इत्यादी आंदोलने आयोजित केले जात आहेत. सध्या राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र यांचे कडून राज्यातील ग्राम पंचायती निवडणुक कार्यक्रम जाहिर झालेला असून ०९ नोव्हेंबर २०२२ रोजी पासून जिल्ह्यात निवडणुक आचार संहिता लागु झालेली आहे. तसेच गोंदिया जिल्ह्यातील ३४८ ग्राम पंचायतच्या निवडणुका १८ डिसेंबर २०२२ रोजी व २० डिसेंबर २०२२ रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल घोषीत होणार आहेत. तसेच २५ डिसेंबर २०२२ रोजी ख्रिश्चन बांधवांचा “नाताळ ख्रिसमस” हा सण साजरा करण्यात येणार आहे.

शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, लाठया किंवा काठया किंवा शारिरीक ईजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे. कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा, यांचे प्रदर्शने करणे. जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजविणे यावर बंदी आदेश लागू राहील.

          प्राधिकाऱ्यांच्या मते ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहोचेल अशा किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसुन येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे अगर सोंग आणने, अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे व त्यांचे प्रदर्शने करणे किंवा त्यांचा जनतेत प्रसार करणे. तसेच उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी तसेच ठाणेदार यांच्या पूर्व परवानगी शिवाय कोणतीही मिरवणूक, मोर्चा काढण्यात येऊ नये. सदर अधिसूचनेची सुचना सर्व उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी तसेच ठाणेदार यांनी आपल्या कार्यालयाच्या सुचना फलकावर लावून

प्रसिध्दी करण्यात यावी. सदर अधिसूचना ११ डिसेंबरच्या च्या ००.०१ वाजे पासून २६ डिसेंबर २०२२ च्या २४.०० वाजे पर्यंत अंमलात राहील.

          सदर अधिसूचना शासकिय तसेच बिन शासकिय कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्य काळात लागू असणार नाही. तसेच प्रेत यात्रा, धार्मिक कार्यक्रमा अंतर्गत काढण्यात येणा-या मिरवणूकीस लागू असणार नाही. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे ज्याच्याकडून उलंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. उपविभागीय दंडाधिकारी तसेच तालुका दंडाधिकारी यांना उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार यांचे अहवालाच्या आधारावर काही विशीष्ट अश्या प्रकरणात सुट देण्याचे अधिकार प्राधिकृत करण्यात येत आहे. अशी माहिती अतिरीक्त जिल्हादंडाधिकारी, गोंदिया स्मिता बेलपत्रे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.