जिल्हयात होणार पुन्हा स्वच्छतेचा जागर

0
23

. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाला सुरुवात

. जिल्हा परिषद गटस्तरापासून तर राज्यस्तरापर्यंत मिळणार अनेक बक्षिसे

        गोंदिया, दि.25 : ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, जीवनस्तर उंचावण्यासाठी राज्य शासनाकडून विविध अभियान राबविण्यात येतात. परिसर स्वच्छता आणि नागरिकांच्या सक्रीय सहभागातून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुन्हा अधिक जोमाने राबविण्यात येणार असून ११ ऑक्टोबरपासून या अभियानाची सुरुवात झालेली असून ३० जानेवारी २०२४ अखेरपर्यंत सदर अभियान राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हयात पुन्हा स्वच्छतेचा जागर होणार आहे.

         अभियानाच्या माध्यमातून गावांमध्ये तयार होणाऱ्या स्वच्छतेच्या नव्या सुविधा, नागरिकांचे स्वच्छतेबाबतीत होणारे मतपरिवर्तन व गावागावांतून सुरु असलेल्या स्वच्छतेच्या चळवळीत ग्रामीण भागातील सर्व नागरिक, ग्रामस्थांचा सक्रीय व सातत्यपूर्ण सहभाग घेवून त्यांच्या वेगवेगळया ग्रामपंचायती, तालुके व जिल्हयात स्वच्छतेच्या विविध पैलुंतील प्रगतीबाबत एक सर्व समावेशक स्पर्धा राबवून व त्या माध्यमातून ग्रामस्थांना प्रोत्साहित करून स्वच्छतेच्या कार्यक्रमाचा आपलेपणा व महत्व पटवून देण्याकरिता जिल्हयात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.

       संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातून जिल्हयात स्वच्छतेचा जागर करून ग्रामपंचायतीत समाविष्ट गावातील वैयक्तिक शौचालये, त्यांचा वापर, मागणी, हागणदारीमुक्त तपासणीचा अहवाल, त्याअनुषंगाने दुरुस्त करावयाची शौचालये, एक खड्डा ते दोन खड्डा करावयाची शौचालये, गावे हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्याकरिता करावयाची कार्यवाही व पूर्तता या बाबत ठोस कृती कार्यक्रम आखून १५ नोव्हेंबरपर्यंत ग्रामपंचायत स्तरावर समिती गठण व कृती कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. २१ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०२३ या काळात जिल्हा परिषद गट स्तरावर स्पर्धा व तपासणी करण्यात येणार आहे.

        २१ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर अखेर जिल्हा परिषद गट स्तरावर प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. ६ ते २१ डिसेंबर अखेर जिल्हा परिषद गट अंतिम तपासणी केली जाणार आहे. २२ डिसेंबर 2023 ते ६ जानेवारी 2024 अखेर जिल्हा स्तरावरील तपासणी व ७ जानेवारी ते ३० जानेवारी २०२४ अखेर विभागीय स्तरावर तपासणी केली जाणार आहे.

     अशी मिळणार बक्षिसे :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेअंतर्गत ग्रामपंचायतींना जिल्हा परिषद गटस्तरावर प्रथम ६० हजार रुपये, जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकास ६ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास ४ लाख रुपये, तृतीय क्रमांकास ३ लाख रुपये, विभाग स्तरावर प्रथम क्रमांकास १२ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास ९ लाख रुपये, तृतीय क्रमांकास ७ लाख रुपये, राज्यस्तरावर प्रथम क्रमांकास ५० लाख रुपये, द्वितीय क्रमांकास ३५ लाख रुपये, तृतीय क्रमांकास ३० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. स्व. वसंतराव नाईक पुरस्कार घनकचरा, सांडपाणी व मैलागाळ व्यवस्थापन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन पुरस्कार तसेच स्व. आबासाहेब खेडकर शौचालय व्यवस्थापन पुरस्कारासाठी ग्रामपंचायतीस विशेष पुरस्कार दिला जाणार असून जिल्हा स्तरावर प्रत्येकी ५० हजार रुपये, विभाग स्तरावर ७५ हजार रुपये त राज्य स्तरावर ३ लाख रुपये देण्यात येणार आहे.

शाश्वत स्वच्छतेच्या महायज्ञात सहभागी व्हा -जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले

        गावात शाश्वत स्वच्छतेच्या या महायज्ञात सर्व ग्रामपंचायती, नागरिक, गांव व तालुकास्तरीय कर्मचारी, अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केले आहे.

अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा -मुकाअ अनिल पाटील

       संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२३-२४ अंतर्गत जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायतीने यात सहभागी होवून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी. या अभियानाच्या माध्यमातून गांवे आदर्श करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.