‘विकसित भारत संकल्प यात्रा‘ आढावा
गोंदिया, दि.10 : केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत याची खात्री करण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” नावाची देशव्यापी मोहिम केंद्र शासनाकडून आखण्यात आली असून १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत देशभरात चित्ररथाच्या माध्यमातून योजनांची जनजागृती करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या मोहिमेच्या माध्यमातून महत्वाकांक्षी योजना लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्या अशा सूचना सह सचिव तथा मिशन संचालक स्मार्ट सिटी मिशन कुणाल कुमार यांनी केल्या. कुणाल कुमार हे ‘विकसित भारत संकल्प यात्रा‘ मोहिमेचे गोंदिया व गडचिरोली जिल्हा प्रभारी आहेत. या मोहिमेत केंद्र व राज्य सरकारच्या सर्व विभागांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गोंदिया जिल्ह्यात ‘विकसित भारत संकल्प यात्रा‘ चित्ररथाच्या माध्यमातून ५४७ ग्रामपंचायतीमध्ये फ्लॅगशिप योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजित आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील व सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. कुणाल कुमार यांनी या मोहिमेची सविस्तर माहिती व रूपरेषा समजावून सांगितली. शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागात हा चित्ररथ फिरविण्यात येणार आहे.
शहरी भागासाठीच्या १७ व ग्रामीण भागाच्या १७ अशा एकूण ३४ फ्लॅगशिप (महत्वाकांक्षी) योजनांची सचित्र माहिती या चित्ररथावर फ्लेक्स स्वरूपात अंकीत केलेली असेल. त्याच सोबत योजनांची माहिती असलेले मुद्रित साहित्य सुद्धा देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी ‘विकसित भारत संकल्प यात्रा‘ जाईल त्या गावात आरोग्य शिबिर घेण्यात यावे असेही त्यांनी सांगितले. या मोहिमेचे जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी जबाबदारी सांभाळणार आहेत.
‘विकसित भारत संकल्प यात्रा‘ मोहिमेसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोहीमपूर्व प्रसार प्रसिद्धी करण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला केल्या. ही मोहिम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची तालुका प्रभारी व गाव प्रभारी (नोडल अधिकारी) म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. गावात येणाऱ्या चित्ररथाच्या आयोजनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात येणार आहे. प्रामुख्याने हे ग्रामस्तरीय कर्मचारी असणार आहेत.
चित्ररथासोबतच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत असे सांगून कुमार म्हणाले की, यासाठी स्थानिक महिला बचतगटांचे सहकार्य घेण्यात यावे. गावात होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती, छायाचित्र व व्हिडीओ, लाभार्थ्यांचे मनोगत, व्हिडीओ बाईट, फीडबॅक केंद्र सरकारने विकसित केलेल्या आयटी पोर्टलवर त्याचक्षणी अपलोड करण्यात यावेत असे श्री. कुमार म्हणाले. केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देणाऱ्या या मोहिमेत नागरिकांनी व लाभार्थ्यांनी सहभागी होऊन माहिती घ्यावी तसेच आपला फीडबॅक कळवावा असे आवाहन कुणाल कुमार, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.
योजना ग्रामीण भाग– आयुष्मान भारत, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, पीएम आवास योजना ग्रामीण, पीएम उज्ज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, किसान क्रेडिट कार्ड, पीएम किसान सन्मान योजना, पीएम पोषण अभियान, हर घर जल जल जीवन मिशन, स्वामित्र योजना, जनधन योजना, जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, पीएम प्रणाम योजना व नमो फर्टिलायझर योजना.
योजना शहरी भाग– पीएम स्वनिधी, पीएम उज्ज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, मुद्रा लोन योजना, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, आयुष्मान भारत, पीएम आवास योजना शहरी, स्वच्छ भारत अभियान, पीएम ई-बस सेवा, अमृत योजना, भारतीय जन औषधी परियोजना, उजाला योजना, सौभाग्य योजना, डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर, खेलो इंडिया, उडान व वंदे भारत ट्रेन आणि अमृत भारत स्टेशन योजना, या योजना केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजना आहेत.