Home विदर्भ शेतकर्‍यांना विश्वासात घेवूनच द्रृतगती महामार्गाकरीता जमीन अधिग्रहण करा

शेतकर्‍यांना विश्वासात घेवूनच द्रृतगती महामार्गाकरीता जमीन अधिग्रहण करा

0

धादरी वासियांचे उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन
तिरोडा (गोंदिया) : नागपूर ते गोंदिया द्रूतगती (समृद्धी) मार्ग बांधकामाचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या संदर्भात काही दिवसांपूर्वी अधिसुचना प्रसिध्द करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातून दु्रतगती मार्ग जाणार आहे. तालुक्यातील ज्या गावातून हा महामार्ग जाणार तेथील शेतकर्‍यांच्या जमीन अधिग्रहीत करण्यात येणार आहे. या महामार्गाच्या बांधकाम करताना शेतकर्‍यांसोबत अन्याय होऊ नये, शेतकर्‍यांना विश्वासात घेवूनच महामार्गाचे काम व्हावे, याकरीता धादरी-उमरी येथील शेतकर्‍यांनी तिरोडाच्या उपविभागीय अधिकारी पुजा गायकवाड यांना निवेदन देवून आपल्या समस्या व मागण्या शासनासमोर ठेवल्या आहेत.
गोंदिया व नागपूर या दोन शहरांना जोडणार्‍या द्रुतगती महामार्गाचे बांधकाम करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. या निर्णयाला राज्यपालांकडून शिक्का मोर्तब झाला असून त्यांच्या आदेशान्वये अधिसुचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा मार्ग तिरोडा तालुक्यातून गोंदियाला जोडला जाणार आहे. या मार्गासाठी तिरोडा तालुक्यातील अनेक गावातील शेतकर्‍यांची जमीन अधिग्रहण करण्यात येणार आहे. यामुळे शेतकर्‍यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या बाबीला घेऊन धदरी, उमरी येथील शेतकर्‍यांनी आगामी जमीन अधिग्रहणाला घेऊन उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे. शेतकर्‍यांना विश्वासात घेऊनच महामार्गाचे काम व्हावे, प्रत्येक प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात यावे, कुटूंबातील एका सदस्याला योग्यतेनुसार शासकीय नोकरीत समावेश करावा, गोंदिया-नागपूर समृध्दी महामार्ग लगत शेतकरी व गावकर्‍यांच्या उपयोगाकरीता दुतर्फा सर्विस रस्ता तयार करावा, जमिन अधिग्रहण करताना आजच्या नविन खरेदी खताच्या पाच पट रक्कम द्यावी, जे शेतकरी भुमिहीन होणार त्यांना शासकीय जमीन उपलब्ध करून द्यावी, आदि मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी व तिरोडाचे आमदार विजय रहांगडाले यांना पाठविण्यात आली आहे.
निवेदन देताना कुमूद पटले, हिमालय पटले, मंसाराम पटले, विजय पटले, निलेश पटले, मोरेश्वर अनकर, बकीराम नागपुरे, प्रभुलाल कुराहे, प्रकाश नागपुरे, महेंद्र दमाहे, अनिल मानकर, सुकराम पटले, रविकुमार बिरनवार, भाऊदास अनकर, शंकर कुराहे, विरेंद्र पटले, मनोहर पटले, अनिल अंबुले, भुमेश्वरी पटले, लक्ष्मीकांत पटले आदिंसह उमरी, धादरी येथील शेतकर्‍यांची उपस्थित होती.

Exit mobile version