
‘जलवीरांच्या’ संघटित प्रयत्नांचे प्रेरणादायी उदाहरण
वाशिम, दि.२० मे-वाशिम तालुक्यातील तामसाळा या छोट्याशा गावाने जलसंवर्धनाच्या क्षेत्रात मोठी कामगिरी बजावली आहे. येथे तब्बल १००१ जलतारे यशस्वीरित्या पूर्ण करून टॅग करण्यात आले आहेत. हे यश सूक्ष्म नियोजन, प्रभावी समन्वय आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागाचा परिणाम असून, जिल्ह्यातील इतर गावांसाठी ते एक प्रेरणादायी मॉडेल ठरणार आहे हे नक्की..!
तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या प्रयत्नातून गावात समन्वय साधून हा उपक्रम राबवण्यात आला. या अधिकाऱ्यांनी गावातील तरुणांना ‘जलवीर’ म्हणून संघटित केले. त्यामुळे युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना बळावली. ग्रामस्थांचा
जलतारे खोदण्याचे केवळ यांत्रिक काम न ठेवता एनजीओ व उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार वाशिम निलेश पळसकर, तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जलतारा उभारणीसाठी योजनाबद्ध प्रयत्न करण्यात आले. प्रारंभी गावकऱ्यांकडून स्वयंप्रेरित योगदान घेतले गेले आणि त्यानंतर शासकीय योजनांचा लाभ घेऊन जलतारे पूर्ण करण्यात आले.
या उपक्रमाच्या यशाबद्दल जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी विशेष शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या, तामसाळा गावाने दाखवून दिले की योग्य नियोजन, सहभाग आणि चिकाटी असेल, तर कोणतेही उद्दिष्ट अशक्य राहत नाही. या टीमचा आम्हाला अभिमान आहे.
ही यशोगाथा तामसाळा गावापुरती मर्यादित राहू नये, तर ती संपूर्ण राज्यासाठी एक ‘मॉडेल’ म्हणून उभी राहील, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.





