
वाशिम, दि. २८ मे –कलेक्टर महोदयांसोबत कॉफी घ्यायचीये? मग ५०० जलतारे पूर्ण करा ना…!या प्रेरणादायी घोषणेनंतर जलतारा अभियानात उल्लेखनीय प्रगती करणाऱ्या गावांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्यासमवेत ‘कॉफी विथ कलेक्टर’ या विशेष कार्यक्रमात ९ गावांना सहभागी होण्याचा मान मिळाला. हा कार्यक्रम आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे उत्साही वातावरणात संपन्न झाला.
या उपक्रमांतर्गत ५०० किंवा त्याहून अधिक जलतारे पूर्ण करणारे सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलिस पाटील, ग्राम रोजगार सेवक आणि वॉटर हिरोज यांचा जिल्हाधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. होत्या. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, जिल्हा कृषी अधिकारी आरिफ शहा, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक बालरोग तज्ज्ञ डॉ. हरीष बाहेती, तहसीलदार निलेश पळसकर, रवी राठोड, तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे, अॅड अनुप बाकलीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यावेळी म्हणाल्या,जलतारा अभियान हे केवळ जलसंधारणाचं नव्हे, तर ग्रामीण समाजाच्या सहभागातून घडणाऱ्या शाश्वत विकासाचं उदाहरण आहे. ५०० जलतारे पूर्ण करणं ही केवळ संख्या नसून, गावकऱ्यांची एकजूट, श्रमप्रतिष्ठा आणि पर्यावरणाप्रतीची बांधिलकी याचं प्रतीक आहे. अशा कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची संधी ‘कॉफी विथ कलेक्टर’च्या माध्यमातून मिळाली, याचा मला आनंद आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी सांगितले,या अभियानात गावकऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेली एकजूट ही प्रशंसनीय आहे. अशा उपक्रमांमुळे प्रेरणा मिळते आणि जलसंधारणाच्या कार्याला नवी दिशा मिळणार आहे.
कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रसेवक अविनाश मारशेटवार यांनी प्रभावीपणे केले.दरम्यान कोंडाळा झामरे,लाडेगाव,तामसाळा, वाघी खूर्द,नागठाणा,गायवळ आदी गावांतील वाटर हिरोज समवेत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी संवाद साधला.
जलतारा योजनेला गती देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा स्वामी विवेकानंद शिक्षण व व्यायाम प्रसारक मंडळ धनज बु .चे अध्यक्ष पत्रकार निलेश पुनमचंद सोमानी यांनी मातोश्री स्वर्गीय श्रीमती स्नेहलता सोमानी यांच्या स्मृतिपित्यर्थ एक लाख एक हजार एकसे अकरा रुपयाची देणगी धनज बु येथील जलतारासाठी दिली. तसेच अॅड अनुप बाकलीवाल यांनी एक लक्ष रुपयांची देणगी दिली. त्याबद्दल जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी बूवनेश्वरी एस. व मान्यवरांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
हा उपक्रम जिल्ह्यातील जलसंपत्तीच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरला असून, अशा कार्यक्रमांमुळे गावपातळीवर काम करणाऱ्या जलदूतांना आवश्यक तेवढं प्रोत्साहन लाभत असल्याचा सुरू या कार्यक्रमाच्या माध्यमातून उमटला.