
बँकांकडून कर्ज वाटपाचा आढावा
वाशिम,दि.१६ जुन : शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटपासोबतच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनेच्या लाभार्थ्यांना बँकांकडून कर्ज वितरीत करण्यात येते. शेतकऱ्यांना व लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे बँकांना दिलेले उदिष्ट हे निर्धारीत वेळेत पुर्ण करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी दिले.
१६ जून रोजी जिल्हास्तरीय बँकर्स समितीची सभा जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांच्या अध्यक्षतेखाली राजे वाकाटक सभागृहात संपन्न झाली. यावेळी आयोजित सभेत त्या बोलत होत्या. सभेला जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यशवीर कुमार, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमती बुवनेश्वरी पुढे म्हणाल्या, ज्या बँकांचे पिक कर्ज वाटपाचे प्रमाण कमी आहे. बँकांनी संवेदनशील होऊन त्यांच्याकडे असलेली विविध केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची कर्ज प्रकरणे तातडीने मंजूर करावी. असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा आकांक्षित असून जिल्हयाच्या विकासात बँकांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे सांगून जिल्हाधिकारी बुवनेश्वरी म्हणाल्या, बँकांकडे असलेली कर्ज प्रकरणे वेळीच मंजूर करावी. बँकांनी यंत्रणांच्या प्रस्तावाबाबत पाठपुरावा करतांना त्यांना प्रतिसाद दयावा. कर्ज प्रकरणे मंजूर करण्यास बँकांनी चालढकल केल्यास संबंधित बँक अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच विविध महामंडळाने आपली कर्ज प्रकरणे मंजूर करण्यासाठी बँकांकडे सातत्याने पाठपुरावा करावा. असे त्या यावेळी म्हणाले.
वाशिम जिल्ह्यातील बॅंकाचे कर्ज ठेवीचे प्रमाण १०१ टक्के असून ५९६९ कोटी ठेवीपैकी ६०१७ कोटी रुपयांचे लाभार्थ्यांना कर्ज वितरीत केले. कर्ज आणि ठेवी यांचे संतुलन राखण्यात वाशिम जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे.सभेला बँकांचे जिल्हा समन्वयक यांची उपस्थिती होती.