प्रदूषण नियंत्रणासाठी मोहीम राबविण्याचे आयुक्तांचे निर्देश

0
8

राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत आढावा बैठक

चंद्रपूर 27 जून  –  प्रदूषण मुक्तीसाठी शासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी प्रत्येकाचा या मोहिमेत सहभाग असणे आवश्यक आहे. चंद्रपूर शहरातील हवा प्रदूषणाची पातळी निर्धारित मानकापेक्षा अधिक व धोकादायक असल्याने सर्व शासकीय विभागांनी प्रदूषण नियंत्रणासाठी मोहीम राबविण्याचे निर्देश राष्ट्रीय शुद्ध हवा समिती चंद्रपूरचे अध्यक्ष आयुक्त विपीन पालीवाल यांनी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत दिले.
आपल्या शहरात वाहनांचे आणि कारखान्यांचे प्रदूषण तर मोठ्या प्रमाणात आहेच मात्र रबरी टायर, पाला पाचोळा व इतर कचरा जाळल्याने मोठ्या प्रमाणात धुर होऊन कार्बन हवेत पसरतो. सकाळ संध्याकाळी कोळसा जाळल्यास त्याचा धुर हा आपल्या श्वास घेण्याच्या पातळीवर असतो आणि तेव्हा तो धोकादायक असतो.शहरातील सर्व वाहने हे पीयुसी प्रमाणित असणे आवश्यक आहे यासाठी आरटीओ कार्यालयाद्वारे पुढील काही दिवस मोहीम राबविण्याचे निर्देशही त्यांनी याप्रसंगी दिले.
नव्या पिढीला शुद्ध हवा, शुद्ध पाणी, स्वच्छ रस्ते देणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्या शहरात, समाजात, कुटुंबात याविषयी जागृती झाली पाहिजे. सांडपाणी, कचरा यांची योग्यरित्या विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. मनपा स्वच्छता निरीक्षकांनी कचरा जाळल्या जाऊ नये याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
याप्रसंगी वायू गुणवत्ता व्यवस्थापन योजना, आरोग्य क्षेत्र नियोजन, परिवहन क्षेत्र नियोजन, औद्योगिक क्षेत्र नियोजन, ध्वनी प्रदूषण क्षेत्र नियोजन,  शहरातील प्रदूषण नियंत्रण, भविष्यातील कृती आराखडा या विषयांच्या अनुषंगाने उपस्थीत अधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले.
सदर बैठकीस डॉ. प्रभा राव शास्त्रज्ञ, निरी,अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी,सिव्हिल सर्जन,जिल्हा पुरवठा अधिकारी, कार्यकारी अभियंता पीडब्लुडी, सीटीपीएसतर्फे महाव्यवस्थापक,महाव्यवस्थापक फेरो अलॉय,महाव्यवस्थापक (पर्यावरण) डब्ल्यूसीएल,उप प्रादेशिक अधिकारी आरटीओ,उप पोलीस निरीक्षक (वाहतूक), शहर अभियंता रवींद्र हजारे, डॉ. अमोल शेळके, सुरेश चोपणे,गोपाळ मुंधडा,इको प्रो अध्यक्ष उपस्थित होते.