
– गावात सर्वच कामांना असते सुट्टी
गोंदिया– नागपंचमी हा सण ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात व परंपरागत साजरा केला जातो. गोरेगाव तालुक्यातील अनेक गावात नागपंचमीनिमित्त ‘सर्फी’ गायन व वारूळ पूजनाची परंपरा असली तरी सटवा येथे आजही दीडशे वर्षांपासूनची परंपरा कायम असून वारूळ पूजनानंतरच गावात पूजा केली जाते.
भारतात अनेक सण-उत्सव मोठ्याप्रमाणे साजरे केले जात असले तरी दिवसेंदिवस त्यात बदल पहावयास मिळत आहे. अनेक सण-उत्सवाना प्रथा परंपरा असून आजही रीतिरिवाजाप्रमाणे सण-उत्सव साजरे केले जात आहेत. नागपंचमी हा सण मोठा नसला व फक्त सापापर्यंतच मर्यादित असला तरी या सणाला ग्रामीण भागात अमर्यादित महत्व असल्याचे दिसून येते. गोरेगाव तालुक्यातील सटवा येथे आजही दीडशे वर्षांपासूनची परंपरा कायम असून ‘सर्फी’ गायन व वारूळ पूजनानंतरच गावात पूजा केली जाते. ‘सर्फी’ म्हणजे नाग देवताच्या संबंधाने असलेले गाणे होत. गावातील आधीपासून गुरु मानलेल्या व्यक्तीच्या येथे नाग देवताचे ‘ठाण’ असू त्या ठिकाणी ‘सर्फी’ची दीक्षा घेतलेले गावातील व्यक्ती जमा होतात. त्यानंतर ‘सर्फी’ गायन करीत ही मंडळी गावातील सीमेत असलेल्या वारुळाचे ‘सर्फी’ गायन करून पूजन केले जाते. त्यानंतर गावातील सर्व मंदिरात ‘सर्फी’ गायन करीत पूजा केली जाते. विशेष म्हणजे त्यानंतरच गावकरी आप आपल्या परीने नागदेवता ची पूजा करतात. ‘सर्फी’ गायन व वारूळ पूजनाची परंपरा ही मागील चौथी ते पाचवी पिढीपासून म्हणजेच जवळपास दीडशे- दोनशे वर्षांपासून असल्याचे सांगितले जाते. ही परंपरा आजही कायम असली तरी काळाच्या ओघात आधुनुकीकरणात नवीन पिढी पुढे येत नसल्याने ही परंपरा जतन करणारी ही पिढीच शेवटची तर ठरणार नाही ना? असाही प्रश्न निर्माण होत आहे.
श्रावणात गोरेगाव तालुक्यातील सटवातील शेतकरी नागपंचमीनिमित्त पारंपारिक पध्दतीने पुजा अर्चना करताना
बॉक्स
आमच्या आधीच्या चार पिढ्या म्हणजेच जवळपास दीडशे ते दोनशे वर्षांपासूनची ही गावात परंपरा आहे. यात फक्त ‘सर्फी’ची दीक्षा घेतलेल्यांनाच ‘सर्फी’ गायन कर्ता येते.
– भोजराज बघेले गावकरी, सटवा
‘सर्फी’ म्हणजे काय?
‘सर्फी’ म्हणजे नागदेवता संबधित मंत्र किंवा त्यासंबंधित गाणे होत. यांना एक विशिष्ट चालीने गायिले जाते. ‘सर्फी’ गायनसाठी विशिष्ठ पद्धतीने दीक्षा घेतली जाते. दीक्षा घेतलेल्या व्यक्तींना काही विशेष नियम व पथ्य पाळावी लागतात. ज्या व्यक्तीने संबंधित दीक्षा घेतली असेल त्यालाच ‘सर्फी’ गायन व वारूळl पूजनाचा अधिकार असतो.





