धर्मरावबाबांच्या नेतृत्वात विराट मोर्चाची उपवनसंरक्षक कार्यालयावर धडक

0
11

आलापल्ली,दि.१६: वने, महसुल, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित समस्यांचे तत्काळ निराकरण करावे, या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी मंत्री व पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम तसेच जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात आलापल्ली येथील उपवनसंरक्षक कार्यालयावर मोर्चा काढला.

वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना तत्काळ जमिनीचे पट्टे वाटप करावे, गैरआदिवासी शेतकऱ्यांना वनजमिनीच्या पट्ट्यासाठी तीन पिढ्यांची अट रद्द करावी, वनविभागाची कामे करताना स्थानिक मजुरांना प्राधान्य द्यावे, मजुरांची थकीत मजुरी तत्काळ द्यावी, अगरबत्ती प्रकल्पात काम करणाऱ्या महिलांना दरमहा ६ हजार रुपये मानधन द्यावे, वनविभागामार्फत करण्यात येणारी रोपवाटिका, थिनींग, लॉगिंग व अन्य कामे पूर्ववत सुरु करावी, सुरजागड लोहप्रकल्पाची विस्तृत माहिती द्यावी, सुरजागड पहाडावर करण्यात आलेल्या वृक्षतोडीची माहिती द्यावी, भामरागड, सिरोंचा व आलापल्ली वनविभागातील तेंदू मजुरांची बोनसची रक्कम तत्काळ अदा करावी, खसरा डेपोत जळाऊ लाकडे व बांबू उपलब्ध करुन द्यावे, वनकर्मचाऱ्यांना वेतनवाढ द्यावी, तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सेवेत समाविष्ट करावे इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर उपवनसंरक्षक श्री.तांबे यांना निवेदन देण्यात आले.

या मोर्चात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, कैलास कोरेत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम, सुकडू कोरेत, पंचायत समिती सदस्य प्रांजली शेंबळकर, आलापल्लीच्या उपसरपंच पुष्पा अलोणे, ग्रामपंचायत सदस्य सतीश आत्राम, माजी सरपंच रेणुका कुळमेथे, अर्चना कोडापे, वासुदेव पेद्दीवार, स्वामी वेलादी, अल्ताफ पठाण, सत्यन्ना मेरगा, उमेश आत्राम, वशिल मोकाशी,  प्रवीण तोटावार, रघु पांढरे, सोमेश्वर रामटेके, मुनेश्वर गुंडावार, संतोष गणपूरवार यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते.