तुमसर,दि.23 : ३३ टक्के महिलांना आरक्षण देणे, महिला सशक्तीकरणाकरिता काँग्रेस कटीबद्ध आहे. आजची सत्ता भाजपच्या हातात नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातात असून भाजप मुखवटा आहे. भाजप सरकार महिला विरोधी असल्याचा आरोप अखिल भारतीय महिला काँग्रेस कमेटीच्या महासचिव तथा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमेटीच्या प्रभारी ममता भूपेश यांनी तुमसर येथे आयोजित पत्रपरिषदेत केला.
देशात काँग्रेसने लोकोपयोगी सुरू केलेल्या योजनांची नावे बदलवून त्या आपल्या नावावर करण्याचा सपाटा भाजपने सुरू केला आहे. स्वत:च्या नविन योजना अंमलात आणल्या नाहीत. काँग्रेस हा असा एकमेव पक्ष आहे की ज्याने महिला पंतप्रधान, राष्टÑपती, लोकसभा अध्यक्ष महिलांकडे सोपविला. काँग्रेसने निती ते राजनितीचा संकल्प केला. प्रत्येक गावात बुथ कमेटीवर पाच महिलांना जोडणार असून काँग्रेस गावात मजबुतीकडे सध्या वाटचाल करीत आहे, असे सांगितले. यावेळी प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चारुलता टोकस म्हणाल्या, महिला सशक्तीकरणासाठी काँग्रेस कटीबध्द आहे. काँग्रेस यापूर्वी सत्तेत होते. परंतु बहुमतात नव्हते. त्यामुळे ३३ टक्के महिला आरक्षणाला भाजपने विरोध केला होता. आता ते पूर्ण बहुमतात असून भाजपने ३३ टक्के महिला आरक्षण बील मंजूर करावे, असे आवाहन केले.
पत्रपरिषदेला माजी खासदार नाना पटोले, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, मधुकर लिचडे, प्रमीला कुटे, सीमा भुरे, ज्योती हरडे, तक्षशिला वाघमारे, डॉ.पंकज कारेमोरे, के. के. पंचबुध्दे, कमलाकर निखाडे, शंकर राऊत, शिवलाल नागपूरे, प्रशांत गभने, प्रफुल बिसने उपस्थित होते.