गोंदिया,दि.22: नागझिरा-नवेगावबांध अभयारण्याचा विस्तार होऊन नवेगाव न्यू नागझिरा व्याघ्रप्रकल्प तयार झाला.त्याकरिता ६५६.३७ हेक्टरचा बफर झोन तयार करण्यात आलेला भाग सुध्दा वनविकास महामंडळ व वनविभागाकडून येत्या मार्चपर्यंत नवेगाव न्यु नागझिरा व्याघ्र प्रकल्पाकडे येणार आहे.हा व्याघ्र प्रकल्प २ हजार ३३३ वर्ग किलोमीटरमध्ये पसरला असून यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान परिसर,नागझिरा,न्यू नागझिरा व कोका अभयारण्याचा समावेश आहे.
उल्लेखनीय म्हणजे हा व्याघ्रप्रकल्प नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहामुळे दोन भागांत विभागला गेल्याने वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावा लागतो.त्यामुळे साकोली जवळील जांभळी फाटा ते qपपळगाव, गोंदिया जिल्ह्यातील डोंगरगाव ते पिताबंरटोला दरम्यान ७.५० मिटर अंतराचे ४ भुयारी मार्गांना वन्यजिव विभागाच्यावतीने मंजुरी मिळाल्याची माहिती नवेगाव नागझिराच्या उपसंचालिका पुनम पाटे यांनी दिली.
वन्यजीवांच्या रक्षणाच्या दृष्टीने आणि त्यांना मोकळीक मिळावी, मानवी जिवांचा व्यत्यय येऊ नये याकरिता नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान परिसरातील जंगलातील गावांचे पुनर्वसन करण्यात आले. आजघडीला वन्यजीवांकरिता जे-जे हवे ते-ते करण्याकरिता नागझिरा-नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पात उपाययोजना करण्यात येत आहेत. उल्लेखनीय म्हणजे हा व्याघ्रप्रकल्प नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहामुळे दोन भागांत विभागला गेला आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे. त्यामुळे वन्यप्राणी खाद्याच्या शोधात भटकंती करत असतात. त्यांना राष्ट्रीय महामार्ग ओलांडून इकडून तिकडे प्रवास करावा लागतो. यात राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना भरधाव वाहनांच्या धडकेत दरवर्षी डझनभरापेक्षा जास्त वन्यजीवांचा जीव जातो.
राष्ट्रीय महामार्गावर ज्याठिकाणावरून वन्यप्राणी रस्ता ओलांडतात त्या परिसरात उड्डाणपूल तयार करण्यात यावा, असा प्रस्ताव वन्यजीव विभागाच्यावतीने ठेवण्यात आला होता.मात्र त्या प्रस्तावाला महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिली नाही. त्यामुळे वन्यजीवांचे रक्षण करण्याकरिता भुयारी मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव वन्यजीव विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सोपविला.
त्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर चार भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहेत. या भुयारी मार्गांवरून वन्यप्राणी राष्ट्रीय महामार्ग ओलांडणार आहेत. दरम्यान यामाध्यमातून वन्यप्राण्यांचा जीव वाचणार आहे. नकाशा, जागा मुकर्रर करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे.
या मार्गातील भुयारी मार्गाला मंजुरी मिळालेली असतानाही राष्ट्रीय महामार्ग विभागाच्यावतीने मात्र या भुयारी मार्गाच्या बांधकामासाठी अद्यापही पुढाकार न घेतले गेल्याने अजून कितीदिवस वन्यप्राण्यांना आपले जीव गमवावे लागणार असा प्रश्न वन्यप्रेमी विचारू लागले आहेत.





