वाशिम, दि. २४ : सीताफळ महासंघ व कृषी विभागाच्यावतीने आज, २४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनमध्ये राज्यस्तरीय सीताफळ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सीताफळ लागवड, प्रक्रिया उद्योग याविषयी तांत्रिक मार्गदर्शन झाले. तसेच जिल्ह्यात सीताफळ लागवड वाढीच्या अनुषंगाने मंथन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे होते. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, अमरावती कृषि सहसंचालक सुभाष नागरे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी, उपाध्यक्ष एकनाथ आगे, सचिव अनिल बोंडे, कोषाध्यक्ष राजेंद्र पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. ठाकरे म्हणाले, आपल्या जिल्ह्यात सीताफळ लागवड वाढण्याची गरज आहे. तसेच जिल्ह्यात सीताफळ प्रक्रिया उद्योग उभारणी होणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेवून प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतीतून चांगले उत्पन्न मिळणे शक्य होईल. जिल्ह्यात सीताफळ लागवड वाढविणे व प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.आमदार श्री. पाटणी म्हणाले, सीताफळ महासंघाने सीताफळ लागवड वाढविणे व प्रक्रिया उद्योग उभारण्यासह बाजारपेठ विकसित करण्यासाठी प्रयत्न करावा. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गामुळे मुंबई, औरंगाबाद व नागपूरसारख्या बाजारपेठेत आपला माल पाठविता येणार आहे. त्यामुळे सीताफळ आधारित उत्पादनांना या बाजारपेठेत चांगला दर मिळून शेतकऱ्यांचा फायदा होईल. आधुनिक शेतीची कास धरून शेतकऱ्यांनी कमी कष्ट व कमी खर्चात अधिकाधिक उत्पन्न घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आमदार श्री. झनक म्हणाले, सीताफळ लागवड ही जिल्ह्याची गरज बनली आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी सीताफळ लागवडीकडे वळावे. सीताफळाची विक्री न करता त्यावर प्रक्रिया करून विविध उत्पादने बाजारपेठेत आणणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योगातून जिल्ह्यातील युवकांना रोजगार सुद्धा मिळेल, असे त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, सीताफळ परिषदेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सीताफळ लागवडीची प्रेरणा मिळेल. तसेच विविध योजनेंतर्गत सीताफळ लागवड होवून त्यावर प्रक्रिया उद्योग उभा राहणे, त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले.
राज्यस्तरीय कार्यशाळेत डॉ. गोविंद मुंढे (शास्त्रज्ञ) यांनी सीताफळ लागवड, व्यवस्थापन व पणन, डॉ. उज्ज्व्ल राऊत यांनी काढणी पश्चात तंत्रज्ञान, सीताफळ गर निष्कासन यंत्र संशोधक प्रा. प्रमोद बकाने यांनी यशस्वी प्रक्रिया उद्योग, करडा कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. रविंद्र काळे यांनी सीताफळ लागवड व्यवस्थापन, श्री. डवरे यांनी सीताफळावरील प्रमुख कीड रोग व त्याचे नियंत्रण, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. तोटावार यांनी वाशिम जिल्ह्यातील भौगोलीक व भुगर्भीय स्थितीनुसार सीताफळ लागवड ही कशी काळाची गरज या विषयी मार्गदर्शन केले. सीताफळ उत्पादकांनी यावेळी आपले अनुभव कथन केले. कृषि विभाग, आत्मा कार्यालय व सीताफळ महासंघाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.





