बोंडगावदेवी(विनायक राखडे),दि.07ः- दर दहा वर्षांनी जनगणना होते या जनगणनेच्या माध्यमातून शैक्षणिक आर्थिक राजकीय प्रशासकीय स्थितीचा शोध घेण्यासाठी ओबीसीची स्वतंत्र जनगणना स्वातंत्रपूर्व काळात इसवी सन 1931 ला इंग्रजांनी केली होती.स्वातंत्र्यानंतर दर दहा वर्षांनी जनगणना होते.आपल्या सरकारने कुत्र्या शेळ्यामेंढ्या,गाढव,कावळे,वाघ,डुकर,उंदीर मोजले जातात, मात्र ओबीसींची जनगणना केली जात नाही.एक एप्रिलपासून जनगणना होणार आहे,तेव्हा त्यामध्ये ओबीसीचा स्वतंत्र रकाना नसेल तर माहिती देऊ नका असे आवाहन ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष बबलू कटरे यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चान्नाबाक्टी येथील बाजार चौकात केले.जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून 60 टक्के असलेल्या ओबीसी घटकांमधील तेली,माळी,सोनार,कोहळी,कुणबी,कलार,पोवार,लोहार,लोधी यासारख्या जातींची सख्या समोर आली तरच अधिकार मिळू शकतील,त्यासाठी ओबीसीची स्वतंत्र जनगणना व्हावी हे आंदोलन महाराष्ट्र सह देशभर होणार सुरु असून या आंदोलनात आपण सर्वांनी सहभागी होऊन 19 फेबुवारील गोंदियाच्या समारोपीय कार्यक्रमात हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असेही आवाहन केले.
बाजार चौकात उपस्थित नागरिकांना एलईडी रथयात्रेच्या माध्यमातून ओबीसींच्या मागण्यां, आंदोलने,शासकीय नोकरीतील स्थिती दाखविण्यात आल्या.गावातील व परिसरातील शेकडो ओबीसी नागरिक उपस्थित होते.ओबीसींना हक्क मिळालाच पाहिजे यासाठी महाराष्ट्राचे कुलदैवत शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गोंदिया येथे जयस्तंभ चौकात 19 फेबुवारीला ओबीसींचे शक्तिप्रदर्शन सरकारला दाखवण्यासाठी सहभागी होण्याचा संकल्प नागरिकांनी यावेळी घेतला.रथयात्रा गावागावात जाऊन प्रचार करत आहे.सोबत ओबीसी संघर्ष कृती समितीचे मार्गदर्शक खेमेद्र कटरे,जिल्हा सचिव उद्धव मेहेंदळे ,तालुकाध्य़क्ष हेमकुष्ण संग्रामे,माजी सरपंच मोरेश्वर सोनवणे,विनायक राखडे,पोलीस पाटील हनुमंत बारसे, रामा सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.





