योगेंद्र यादव साधणार शेतकऱ्यांशी संवाद

0
10

नागपूर दि. २२ – : आम आदमी पक्षातून बाहेर पडलेले योगेंद्र यादव यांनी देशभरात ‘स्वराज अभियान’ सुरू केले आहे. याअंतर्गतच ४ जुलै रोजी नागपुरात ‘विदर्भ किसान संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यादव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. विदर्भातील शेतकरी या कार्यक्रमात सहभागी होणार असून ‘आप’ च्या धोरणांमुळे नाराज असलेले अनेक कार्यकर्तेदेखील येण्याची शक्यता आहे.

आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्षांतर्गत लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी केला होता. ‘आप’मधून हकालपट्टी झाल्यानंतर या दोघांनी ‘स्वराज अभियान’सुरू केले.

‘आप’चे अनेक कार्यकर्ते यादव यांच्यासोबत आले. त्यानंतर देशभरात कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, गुजरात, मध्य प्रदेश, बंगाल, आसाम, हरियाणा,जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, या राज्यात हजारोंच्या उपस्थितीत ‘स्वराज संवाद’ चे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. ‘स्वराज अभियान’ ने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ‘जय किसान आंदोलन’ सुरू केले आहे.

४ जुलै रोजी शंकरनगर येथील साई सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. त्यानंतर योगेंद्र यादव हैदराबादकडे रवाना होणार आहेत. यावेळी भूमी अधिग्रहण कायदा, शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, त्यांच्या शासनाकडून अपेक्षा, प्रत्यक्ष भोगाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा या मुद्यांवर योगेंद्र यादव शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.