नागपूर दि. २२ – : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरसह पूर्व विदर्भातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवार रात्रीपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस सोमवारीही दुपारपर्यंत सुरूच होता. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे.
चंद्रपुरात शनिवारी रात्री पावसाने कहर केल्याने सोमवारी शहरवासींना थोडाफार दिलाला मिळाला. गडचिरोली जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असून काल झालेल्या जोरदार पावसामुळे वैरागड-मानापूर (ता. आरमोरी) रस्ता बंद झाला आहे. एटापल्ली तालुक्यातील गेदा गावात 10 वर घरे पडली आहेत. गोंदिया शहरातील सुंदरनगर भागात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. वर्धा, भंडारा जिल्ह्यांत पावसाची रिपरिप सुरूच आहे. नागपुरात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. शहरातील सखल भागात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. नाल्याकाठावरील भागात पूरसदृशस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार पावसामुळे झाडे उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. शहरातील अनेक कॉम्प्लेक्समधील तळभागात, वऱ्हांड्यात गुडघाभर पाणी साचले असल्याने रहिवाशांची अडचण झाली आहे.