
गोंदिया,दि.7 : कोविड-19 च्या महासंकटामुळे गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत 693 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला
आहे. जिल्हा प्रशासनाद्वारे सातत्याने कोरोना संकटात सापडलेल्या कुटूंबांना भेट देण्यात येत असून त्यांचे मनोबल
वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. यातील काही कुटूंबे हे अत्यंत अडचणीत आहेत. घरातील कमावत्या पुरुषाचा
मृत्यू झालेला आहे, असे देखील अनेक प्रकरणांमध्ये घडलेले आहे. शासनाच्या वतीने ज्या योजनांचा लाभ या कुटूंबांना
देता येईल त्याकरीता गोंदिया जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.
जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच सामाजिक संघटना यांना आवाहन करण्यात येते की, संकटामध्ये
सापडलेल्या या कुटूंबांना आपण कशाप्रकारे मदत करु शकतो याचा आपण विचार करुन आपल्या स्तरावरुन त्यांना जी
मदत करता येईल ती मदत करावी. किमान अशा कुटूंबांना भेट देवून त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करावा. असे
आवाहन जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले आहे.





