
गोंदिया,दि.17ः इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांसाठी मंजूर अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते. मात्र जिल्ह्यात त्याची अमलबजावणी होत नसल्याने कामगारांना अर्थसाहाय्यापासून वंचित राहावे लागत आहे. तातडीने या योजनेची अमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी आसोली जि. प. क्षेत्राच्या सदस्य लक्ष्मी रवी तरोणे यांनी केली आहे.
महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ग्रामीण भागातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वत:च्या जागेवर नवीन घर बांधण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रुपांतर करण्यासाठी निर्णय घेण्यात आला. या योजनेत घरकूल बांधण्यासाठी बांधकाम कामगाराला अर्थसहाय्य देण्याचा उल्लेख आहे. त्याकरिता ग्रामीण भागातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्वाची असताना देखील जिल्ह्यात योजनेची अमलबजावणी सुरू झाली नाही. त्यामुळे बांधकाम कामगार अद्यापही आवास योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. या योजनेची अमलबजावणी करून कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी रवी तरोणे यांनी केली आहे.





