
गडचिरोली,दि.21-राज्यातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प असलेल्या कमलापूर व पातानील येथील हत्तींच्या स्थलांतराला वेग आलेला असून, जिल्ह्यातील एकमात्र हत्ती कॅम्प वाचवण्याकरिता व केंद्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याकरिता जिल्हा काँग्रेसच्यावतीने कमलापूर येथे आज २0 मे रोजी गांधीगिरी मार्गाने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली एकदिवशीय ठिय्या आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात महिला काँग्रेस अध्यक्ष रुपाली पंदिलवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लॉरेन्स गेडाम, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, रोजगार स्वयंम रोजगार सेल जिल्हाध्यक्ष दामदेव मंडलवार, विमुक्त भ. जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण, जिल्हा सचिव सुनील चडगूलवार, एटापल्ली ता.अध्यक्ष संजय चरडूके, नगरसेवक निजाम पेंदाम, मोहन नामेवार, आकाश परसा, अक्षय भोवते, हरबाजी मोरे, संजय चन्ने, वसंत राऊत, प्रभाकर कुबडे, जितेंद्र मूनघाटे, अंकुश गाढवे, सुधीर बांबोले, रजाक खान, किसन हिचमी, मनोहर बोरकर, अमर गाढवे, संतोष मडावी, नागाजी कोरत, रामेश्वर, देवानंद गावडे, तानाजी दुर्वा, लालसू, भुजनगराव तोडसाम, रंगा गावडे, रवी कुमरे, चरणदास गावडे,लुका मडावी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व गावकरी संख्येने उपस्थित होते.
अहेरी,दि.21ः- कमलापूर आणि पातानील येथील हत्ती गुजरात येथील जामनगर येथील खासगी एलिफंट पार्कला हलविण्याच्या विरोधात शुक्रवारी २0 मे रोजी सकाळीं भारतीय जनता पार्टीतर्फे आलापल्ली येथील शहीद अजय मास्टे चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आला. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांच्यावतीने तब्बल दोन तास वाहतूक रोखून धरल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी स्वत: आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले. त्यानंतर भाजपा कार्यकत्यांनी आलापल्ली येथील वनविभागाच्या वनसंपदा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनही केले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर तथा पातानिल येथिल हत्ती त्यांच्या नैसर्गिक वास्तव्याच्या ठिकाणावरून हजारो किलो मीटर दुर गुजरातला पाठविण्याचे काम शासन करीत आहे. सदर हत्ती हलविण्याचे राज्य शासनाचा निर्णय तत्काळ रद्द करावा. हत्तीमुळे कमलापूर परिसरातील पर्यटन वाढले पयार्याने रोजगारसुद्धा वाढले आहे. सर्व हत्ती नैसर्गिक अधिवासात असून सुदृढ आहेत. कमलापूर जंगल परिसरातील रानम्हशी, जावळ सुद्धा आहे. येथील जंगल परिसरात नैसर्गिक वातावरणात वन्यप्राण्यांसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे, येथील हत्ती गुजरात सारख्या उष्ण भागात हलविणे चुकीचे आहे. त्यामुळे हत्तींच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, त्याचबरोबर कमलापूर परिसरातील लोकांना रोजगारापासून मुकावे लागणार आहे. त्याकरता हत्तींची इथेच सुविधा वाढवून देखभालीसाठी प्रशिक्षित कर्मचारी नेमून त्यांना सरंक्षण देण्यात यावे. हत्ती हलविण्याच्या प्रयत्न झाला तर आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
सदर आंदोलन भाजप तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा महासचिव रवींद्र ओल्लालवार, ज्येष्ठ नेते प्रकाश गुडेल्लीवार, तालुका महामंत्री संतोष मद्दीवार, मुकेश नामेवार, रमेश समुद्रालवार, अमोल गुडेल्लीवार, सुकमल मंडल इत्यादी पदाधिकार्यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.





