24.5 C
Gondiā
Tuesday, August 25, 2026
Home महाराष्ट्र बंद वीज कनेक्शन पुन्हा सुरू होण्यासाठी सवलत योजनेचा ४३ हजार ग्राहकांना लाभ

बंद वीज कनेक्शन पुन्हा सुरू होण्यासाठी सवलत योजनेचा ४३ हजार ग्राहकांना लाभ

0
29

गोंदिया, दि. ११ जानेवारी २०२३ : आर्थिक अडचणीमुळे वीजबिल भरता आले नसल्याने कनेक्शन बंद झालेल्या ग्राहकांना बिलावरील व्याज आणि दंड माफ करण्याच्या महावितरणच्या योजनेचा राज्यातील घरगुती व औद्योगिक अशा एकूण ४३,३४५ ग्राहकांनी लाभ घेतला आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे अनेक वीज ग्राहकांना वेळेत बिले भरता आली नव्हती. त्यांच्या बिलाची थकबाकी होती. बिलाच्या मूळ रकमेवर व्याज जमा झाले होते शिवाय दंडात्मक रक्कमही भरणे गरजेचे होते. यामुळे थकित रक्कम अधिक वाढली होती. थकित बिलामुळे वीज कनेक्शन तोडले गेले होते. अशा ग्राहकांना वीज पुरवठा पुन्हा सुरू व्हावा म्हणून महावितरणने श्री विलासराव देशमुख अभय योजना लागू केली होती. त्यानुसार संबंधित ग्राहकांनी बिलाची मूळ रक्कम भरली तर त्यांना बिलाच्या रकमेवरील व्याज आणि दंड माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेची मुदत ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपली. या योजनेमध्ये प्रामुख्याने घरगुती ग्राहकांनी वीजबिलांची मूळ रक्कम भरून पुन्हा वीज कनेक्शन जोडून घेतले.

या योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यभरातील एकूण ३०,५७१ घरगुती ग्राहकांपैकी सर्वाधिक १४, य५०५ ग्राहक कोकण विभागातील आहेत. त्यांच्या खालोखाल औरंगाबाद विभागातील ७,९६० ग्राहक आहेत. पुणे विभागातील ३,६८६ तर नागपूर विभागातील ४,४२० ग्राहकांनी सवलत योजनेचा लाभ घेतला आणि पुन्हा वीज कनेक्शन जोडून घेतले.

बंद पडलेली वीज कनेक्शन पुन्हा सुरू करून घेण्यासाठी ग्राहकांनी सवलत योजनेचा लाभ घेतला व त्यांच्याकडून एकूण ९५.७१ कोटी रुपये महावितरणला मिळाले. यामध्ये कोकण विभागाचा एक्केचाळीस कोटींचा वाटा आहे.