विषाची बाटली घेऊन शेतकरी पोहचला कृषी कार्यालयात

0
284

संतप्त शेतकऱ्यांचा कृषी अधिकाऱ्यांना घेराव
पुसद, ता.20–पंतप्रधान किसान योजनेचे हप्ते रखडल्याने
कृषी विभागाकडे चकरा मारून थकलेल्या
एका शेतकऱ्याने चक्क विषाची बाटली घेऊन
पुसद तालुका कृषी कार्यालय गाठले.मात्र, अधिकाऱ्यांनी उडवा उडवीचे उत्तरे देऊन
शेतकऱ्यांचा संताप ओढवून घेतला.संतप्त शेतकऱ्यांनी काही काळ तालुका कृषी अधिकाऱ्यांना घेराव घातला.त्यामुळे एकच खळबळ उडाली.

या अन्यायग्रस्त शेतकऱ्याचे नाव श्याम तुकाराम काळे (रा. श्रीरामपूर) .असून त्याची कवडीपुर शिवारात शेती आहे. या शेतकऱ्याचे पंतप्रधान किसान योजनेचे हप्ते रखडलेले आहेत.या संदर्भात अनेक वेळा तक्रारी तालुका कृषी अधिकारी यांना देऊनही वेळ काढू धोरण अवलंबित आहे. अनेक वेळा ऑफिसच्या चकरा मारून सुद्धा अधिकारी कर्मचारी दखल घेत नाही. त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने विषाची बाटली हाती घेत तालुका कृषी कार्यालय गाठले.मात्र हा प्रकार लक्षात येताच बिरसा मुंडा ब्रिगेडचे मारुती भस्मे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. सध्याच्या दुबार पेरणीच्या संकटामुळे हवालदिल झालो. अखेर आर्थिक संकट मोठ्या प्रमाणात ओढवेल या भीतीने विष प्राशन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. त्यावर
कृषी अधिकारी कार्यालयात उपस्थित अधिकारी व इतर शेतकऱ्यांनी आत्महत्येने मार्ग निघत नाही. आपण अधिकाऱ्यांना बोलून तुमचा प्रश्न मार्गी लावू असे सांगून त्याच्या जवळची विषाची बाटली काढून घेतली.त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

त्या शेतकऱ्याची व्यथा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे मांडली . परंतु .अधिकाऱ्यांनी उडवा उडवी चे उत्तर दिले.तालुका कृषी अधिकाऱ्याची व संवेदनशीलता पाहून शेतकऱ्यांचा राग अनावर झाला.शेतकऱ्याने प्रत्यक्ष आत्महत्या करावी का?असा सवाल करत संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला.यावेळी शेतकऱ्यांच्या गर्दीतून एक नव्हे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असल्याचे दिसून आले.यावेळी हजर असलेल्या शेतकऱ्यांनी तक्रारींचा पाढाच कृषी अधिकाऱ्यांसमोर मांडला. बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष मारोती भस्मे यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत गंभीर नसलेल्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली. शेवटी सर्व शेतकऱ्यांच्या तक्रारी घेऊन तक्रारींचे निवारण करणार असल्याची ग्वाही तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे यांनी दिली.

कोट
तक्रारकर्ता शेतकरी बाटली घेऊन कार्यालयात आला.पंतप्रधान योजनेचे हप्ते खात्यात जमा न झाल्याने त्याचा संताप अनावर होता.या प्रकरणाची चौकशी केली असता त्याचे बँक खाते
बंद असल्याने रक्कम जमा होऊ शकले नाही.त्याची समजूत काढून खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात येईल.कुठलाही अविचारी मार्ग अवलंबू नये.
– विजय मुकाडे
तालुका कृषी अधिकारी, पुसद