चंद्रपूर : तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील देवपायली बिटातील नवानगर येथील जनाबाई जनार्धन बागडे (५१) या महिलेसह तर नागभीड तालुक्यातील मिंडाळा कोसंबी गवळी येथील शेतकरी दोडकू शेंदरे या दोघांचा बळी घेणाऱ्या वाघाला वनविभागाच्या पथकाने शुक्रवारी बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देवून जेरबंद केले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. जेरबंद करण्यात आलेला वाघ हा टी-११५ या वाघिणीचा २० महिन्यांचा नर बछडा आहे.
तळाेधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १३२ मध्ये टी-११५ या वाघिणीचा २० महिन्यांच्या बछड्याने धुमाकूळ घालत दोघांचा बळी घेतला आहे. २३ जुलै रोजी नागभीड तालुक्यातील मिंडाळा कोसंबी गवळी रस्त्यालगतच्या दोडकू शेंदरे या शेतकऱ्यांचा तर नवानगर येथे जनाबाई जनार्धन बागडे या महिलेचा बळी घेतला होता. या वाघामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती. सदरच्या वाघाला जेरबंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी लावून धरली होती. त्यामुळे वनविभागाच्या पथकाने नवानगर परिसरातील कक्ष क्रमांक १३२ मध्ये पिंजरे लावण्यात आले होते.





