महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. महायुतीच्या नव्या सरकारच्या स्थापनेनंतर 7 डिसेंबरला विधिमंडळाचं अधिवेशन बोलावण्यात आलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 12 दिवसांनी अखेर राज्यात नव्या सरकारची स्थापना झाली आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीनंतर मंत्रालयात घडामोडींना वेग आला आहे. तीनही नेते मंत्रालयात पोहोचले आहेत. तीनही प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडत आहे. या बैठकीत नेमके कोणते मोठे निर्णय घेण्यात येतील? याबाबत उत्सुकता लागलेली असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. 
येत्या 7 डिसेंबरला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे.मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर स्वाक्षरी केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारांसाठी ५ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून कर्मचाऱ्यांना याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विधिमंडळ सचिवालयाकडून सर्व कर्मचाऱ्यांना उद्या तयारीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. हा कार्यक्रम जवळपास दोन दिवस चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे विशेष अधिवेशन दोन दिवस असण्याची शक्यता आहे. या विशेष अधिवेशनानंतर दोन आठवड्यांनी नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार आहे.
मंत्रालयात हालचालींना वेग
तीनही नेते मंत्रालयाच्या गेटवर आले तेव्हा लाडक्या बहिणींनी तीनही नेत्यांचं औक्षण केलं. दरम्यान, शपथविधी सोहळ्यानंतर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर हालचाली वाढल्या. सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचं दालन आहे. तिथे एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणूनची पाटी बदलून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी लावण्यात आली. तर देवेंद्र फडणवीस यांची पाटी असलेल्या उपमुख्यमंत्रीपदाच्या दालनाबाहेर एकनाथ शिंदे यांची पाटी लावण्यात आली. अजित पवार यांच्या दालनाबाहेरील पाटीमध्ये बदल करण्यात आली नाही. कारण याआधीदेखील ते उपमुख्यमंत्री होते.




