कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

0
65
*मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांचे नेतृत्वात भात व शिंगाडा लागवडीचे प्रात्यक्षिक
गडचिरोली, 2 जुलै : कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘कृषी दिन’ साजरा करताना गडचिरोली जिल्हा परिषदेने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. जिल्हा परिषद गडचिरोली येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत विविध उपक्रम पार पाडल्यानंतर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा या गावात प्रत्यक्ष शेतात जाऊन भात रोवणी केली आणि शिंगाडा लागवडीचा अभ्यास केला.
मुख्य कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. किशोर झाडे, कृषी विकास अधिकारी आनंद पाल, जिल्हा मृदा चाचणी अधिकारी प्रदीप तुमसरे, तंत्र अधिकारी आनंद कांबळे तसेच कृषी विभागातील अनेक अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाची सुरुवात आनंद पाल यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी कै. वसंतराव नाईक यांचे जीवनकार्य आणि कृषी दिनाचे महत्त्व सांगितले. यानंतर जिल्ह्यातील पीक स्पर्धा व कृषी पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान’ योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वितरण करण्यात आले. कृषी विषयक सखोल मार्गदर्शन सत्रात डॉ. लाकडे यांनी फळबाग व भाजीपाला लागवडीबाबत माहिती दिली, तर डॉ. झाडे यांनी भात व तुर लागवडीवर भर दिला. श्री. तुमसरे यांनी मृदा आरोग्य पत्रिकेचे महत्त्व पटवून दिले. आनंद कांबळे यांनी “AI in Agriculture” आणि “महाविस्तार” ॲपविषयी सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप भोयर व सुनील बुद्धे यांनी केले, तर आभार श्री. चलकलवार यांनी मानले.
मुख्य कार्यक्रमानंतर अधिकारी पथक पाथरगोटा गावातील शेतकरी श्री. रामदास दोनाडकर यांच्या शिंगाडा लागवडीस भेट देण्यासाठी रवाना झाले. येथे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर शेतकरी काशिनाथ दोनाडकर यांच्या शेतात भात रोपवाटिकेची पाहणी केली आणि स्वतः भात रोवणी केली. यानंतर शेतकऱ्यांसोबत शिंगाडा व भात लागवडीबाबत चर्चासत्र झाले.
या क्षेत्रभेटीत विनोद उद्धरवार (कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा), नितीन पाटील (उपअभियंता, यांत्रिकी), शेखर शेलार (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन), नारायण सरदार (कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग), चेतन हिवंज (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मनरेगा), रवींद्र कणसे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत), श्री. कावळे (मुख्य लेखा व वित्त अधिकारी), मंगेश आरेवार (गटविकास अधिकारी आरमोरी), निलेश गेडाम तालुका कृषी अधिकारी आरमोरी, अशोक कुर्जेकर सहाय्यक गटविकास अधिकारी आरमोरी, संदीप नाकाडे मंडळ कृषी अधिकारी आरमोरी, कृष्णदास दोनाडकर कृषी अधिकारी पंचायत समिती आरमोरी, योगेश रणदिवे कृषी अधिकारी आरमोरी तसेच आरमोरी तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी विभाग अधिनस्त सर्व अधिकारी कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.