एस.डी.ओ., तहसीलदार, कृषी अधिकारी यांच्यासोबत आपत्कालीन बैठक घेऊन दिले कडक निर्देश
गोंदिया। 11 ऑक्टोबर-गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे गोंदिया तालुक्यातील धानासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकांसोबतच अतिवृष्टीमुळे घरांचे नुकसान झाल्याने शेतकरी सणासुदीच्या काळात आर्थिक अडचणीत सापडला आहे.
धान पिकांचे व घरांचे झालेले नुकसान पाहता अनेक शेतकऱ्यांनी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांना शेताची विद्यमान स्थिती सांगितली होती. विशेष म्हणजे गोंदिया तालुक्यात हलक्या धानाची लागवड जास्त प्रमाणात होते. सध्या अनेक शेतकऱ्यांचे धान कापून ठेवलेले असून अतिवृष्टीमुळे ते नष्ट झाले आहे. धानावर मावा व तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ही स्थिती संपूर्ण परिसरात सारखीच आहे.
शेतकऱ्यांच्या या समस्येला गांभीर्याने घेत आमदार विनोद अग्रवाल यांनी 10 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात आपत्कालीन बैठक घेतली. या बैठकीत आमदार अग्रवाल यांनी गोंदिया तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धान पिकांचे व घरांचे झालेले नुकसान तात्काळ पंचनामे करून शासनाकडे पाठविण्याचे कडक निर्देश दिले.
या आपत्कालीन बैठकीला एस.डी.ओ. चंद्रभान खंडाईत, तहसीलदार शमशेर पठाण, उपतहसीलदार श्रीकांत कांबळे, बी.डी.ओ. महेंद्र मडामे, कृषी अधिकारी नेहा आढव, नायब तहसीलदार सीमा पाटणे, छगन माने, राजू कटरे, लखन हरिनखेड़े तसेच शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.





