गोरेगाव :तालुक्यात २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात कापणी केलेल्या धान पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी राजा संकटात सापडला असून, शासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी निंबा येथील सरपंच वर्षा पटले यांनी केली आहे.तालुक्यातील निंबा परिसरातील शेतकऱ्यांच्या धान पिकाचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची दखल घेत सरपंच वर्षा पटले यांनी महसूल अधिकारी दीक्षा वाकले, कृषी सहाय्यक उमेश मडावी व ग्रामविकास अधिकारी विलास सूर्यवंशी यांना नुकसानीची माहिती दिली. यानंतर सोमवारी (दि.२७) महसूल अधिकारी दीक्षा वाकले व कृषी सहाय्यक उमेश मडावी, ग्रामविकास अधिकारी विलास सूर्यवंशी यांनी ग्रामपंचायत निंबाला भेट दिली तसेच शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.यावेळी उपसरपंच नंदलाल उईके, ग्रामपंचायत सदस्य मालता भगत, पुरुषोत्तम कटरे, तंटामुक्ती अध्यक्ष बुधराम बिजेवार, शेतकरी योगराज ठाकरे, राधेश्याम पटले, सुकराम कोल्हे, लोकचंद कटरे, कुवरलाल शेंडे, गणेश भगत, सुरज मसे, सुरज गौतम, संजय ठाकरे, प्रेमलाल मसे आदी शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.





