
गोंदिया,दि.०४– पावसाने शेतकऱ्यांचे कापणी झालेलं पीक पूर्णतः नासाडी झालेले आहे. उभे असलेल्या पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने ते धान पीक पूर्णतः उद्धवस्त होण्याच्या वाटेवर असल्याने शासनाने तात्काळ कोणतीही अट न घालता शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक जाहीर करावी, अशी मागणी,जी. डी. सी. सी. बँकेचे संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे यांनी केली आहे.
गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे. जवळपास ९५ टक्के शेतकरी हे धानपिकाचे उत्पादन घतात. धानपीक ऑक्टोबर महिन्यात कापणीला येत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी हलक्या वाणाच्या धानाची कापणी केलेली आहे. मात्र मागील आठवडयापासून अवकाळी पावसाने झोडपायला सुरुवात कली असल्याने व उघाड देत नसल्याने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतातील धानाला कोंब फुटले असून शेतकऱ्यांना मळणी करणे शक्य होणार नाही, भारी वाणाचे धान जरी कापलं नसले तरी त्यावर प्रतिकूल हवामानामुळे खोडकिडा, मावा यासारख्या रोगांचा प्रचंड प्रादुर्भाव झालेले असल्याने उभ्या पिकाचीही माती होत आहे. यामुळे जनावरांसाठी वैरणाची समस्याही निर्माण होत आहे.आधीच शेतकरी हवालदिल असल्याने या अवकाळी पावसाने मात्र शेतकऱ्यांचे पूर्णतः कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांना काय करावं काय करु नये हे सुचेनासे झालेले आहे. जवळपास जिल्हयातील सर्वच शेतकऱ्यांचे धानपिकाची पूर्णतः नासाडी झाल्यामुळे पिकांचे पंचनामे न करता शासनाने सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी, जी.डी.सी. सी. बँकेचे संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे यांनी केली आहे.




