26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home मराठवाडा/खान्देश एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री केल्यास ग्राहक आयोगाकडे तक्रार करा-जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार

एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री केल्यास ग्राहक आयोगाकडे तक्रार करा-जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार

0
38
जिल्हा ग्राहक संरक्षण समिती बैठक
धाराशिव,दि.११ मार्च – सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची बैठक जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी तथा जिल्हा ग्राहक संरक्षण समिती सदस्य सचिव श्रीमती स्वाती शेंडे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप कुटे,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रविंद्र खंदारे,ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सचिन कवडे,शरद वडगांवकर,रवीशंकर पिसे,संतोष केंदळे,आशिष बाबर,अजित बागडे, तसेच ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य अंकुश उबाळे, रविंद्र शिराळ,बालाजी जावळे, शहाजी चेडे,गजानन कुलकर्णी यांच्यासह जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे शासकीय सदस्य आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत मागील बैठकीतील इतिवृत्ताच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला.त्यानंतर अशासकीय सदस्यांनी विविध ग्राहक संबंधित समस्या मांडल्या.यामध्ये खवामधील भेसळ,मिठाईमध्ये वापरण्यात येणाऱ्या तेलावर एक्सपायरी नसणे, रस्त्यावरील खाद्यपदार्थांची विक्री,हॉटेल्समधील अस्वच्छता, बसस्थानकांमधील स्वच्छतागृह वापरण्यासाठी महिला प्रवाशांकडून पैसे घेणे,खाजगी शिकवणी वर्गांकडून अवाजवी शुल्क आकारणे,गुटखा बंदी असतानाही पानटपऱ्यांवर सर्रास विक्री होणे, नगर परिषदेमार्फत शहरात पिण्याचे पाणी वेळेवर न येणे,नाले सफाईची कामे वेळेवर न होणे,गर्दीच्या ठिकाणी सुलभ शौचालयांची कमतरता,ग्रामीण भागात अनुदानित संस्थेमार्फत व्हॅकेशन बॅचेसच्या नावाखाली आर्थिक लूट तसेच पेट्रोल पंपावर स्वच्छतागृहांची सुविधा नसणे अशा विविध समस्या उपस्थित करण्यात आल्या.
ग्राहक संरक्षण समितीच्या सदस्यांनी मांडलेल्या अडचणी या संयुक्तिक व गरजेच्या असून त्यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात,तसेच संबंधित दोषींवर दंडात्मक व सक्त कारवाई करावी,अशा सूचना जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. त्यांनी स्पष्ट केले की,एमआरपीपेक्षा जास्त दराने खाद्यपदार्थांची विक्री होत असल्यास नागरिकांनी ग्राहक आयोगाकडे तक्रार नोंदवावी.