*मान्सून पुर्वतयारी आढावा सभा*
भंडारा, दि.12 : भंडारा जिल्ह्यात वैनगंगा ही प्रमुख नदी आहे. जिल्ह्यातील मोठे धरण व नद्यांमुळे पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे मान्सून कालावधीत सर्व विभागाने आपसात समन्वय ठेवून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात आज मान्सून पुर्वतयारी आढावा सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार, विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सावन कुमार म्हणाले, आपत्ती ही कधीही सांगून येत नसते. तयारी न करता ओढवलेल्या आपत्तीचे व्यवस्थापन करणे कठीण असते. पावसाळ्याच्या दिवसात अचानक पूर येणे, धरण फुटणे, रस्ता वाहून जाणे, गाव पाण्याखाली येणे अशा आपत्ती ओढवतात. त्यामुळे सर्व विभागांनी आपत्ती निवारणासाठी सज्ज राहावे अशा सूचना त्यांनी यंत्रणांना दिल्या.
यासाठी सर्व विभागाने जबाबदार नोडल अधिकारी नियुक्त करावे. सर्व जलसाठे, प्रकल्प व बंधारे, रस्ते, पुल, मोऱ्या, इमारती, विद्युत यंत्रणा तपासणी करुन आवश्यक दुरुस्ती, देखभाल करण्यात यावी. आरोग्य विभागाने लसी, औषधे व साधनसामुग्री पुरेशा प्रमाणात आगाऊ उपलब्ध करुन ठेवावे. सर्व पाणी साठ्यांची दैनंदिन तपासणी व निर्जंतुकीकरण करण्यात यावे. शहरातील व गांवातील नाल्यांची सफाई व कचऱ्यांची विल्हेवाट लावण्यात यावी. बुजलेली गटारे/नाल्या साफ करण्यात यावे. मान्सून काळात पुरेशा प्रमाणात धान्य पुरवठा साठवणूक करुन ठेवावे असे ते म्हणाले.
प्रत्येक गावात प्रथम प्रतिसाद चमू तयार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मान्सून कालावधीत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करून तो 24 तास कार्यरत राहील याची खात्री करावी असे ते म्हणाले.
भंडारा जिल्ह्यात 154 गावे पुरप्रवण असून या गावात विशेष उपाययोजना असलेला आराखडा तयार करावा. तालुकानिहाय नियंत्रण कक्ष स्थापन करून नियंत्रण कक्षात पूर्ण कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. कार्यप्रणालीची प्रमाणित कार्यपद्धती (SOP) अद्ययावत करून आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पाठविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
मान्सून काळात धरणाचे पाणी सोडतांना गावकऱ्यांना पूर्व सूचना देण्यात यावी. त्यासाठी दवंडी, सोशल मिडिया आदींचा वापर करण्यात यावा असे त्यांनी सांगितले. आपल्या कार्यक्षेत्रात सुरक्षीत निवारा, समाज भवन, शाळा, मंगल कार्यालय, लॉन, मोठ्या इमारती इत्यादींची ओळख करून त्या आरक्षीत करण्याबाबत कार्यवाही आताच करावी. प्रत्येक तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घ्यावी असे निर्देश दिले.
पूर किंवा घटना घडल्यानंतर चोविस तासाच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती देण्यात यावी. तालुकास्तरीय कंट्रोल रुम कार्यान्वित करावी तसेच सुरक्षित निवारा येथे मूलभूत सुविधा आहेत का याची खातरजमा करावी. सर्व यंत्रणांनी पूरपरिस्थिती व आपत्तीच्या काळात समन्वय ठेवून काम करावे तसेच दिलेल्या जबाबदारीचे गांभीर्याने पालन करावे अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण यांनी केल्या. संपर्क तुटणाऱ्या गावांना उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी भेटी देऊन नागरिकांना माहिती द्यावी असेही त्यांनी सांगितले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी मान्सून पुर्वतयारीबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती विषद केली.





