29.8 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ केंद्र शासनाच्या  योजनांपासून जिल्ह्यातील नागरिक वंचित राहू नये :खासदार डॉ.प्रशांत पडोळे

केंद्र शासनाच्या  योजनांपासून जिल्ह्यातील नागरिक वंचित राहू नये :खासदार डॉ.प्रशांत पडोळे

0
79
गोंदिया, दि.13 : केंद्र शासनाच्या योजनांपासून जिल्ह्यातील नागरिक वंचित राहू नये, यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्नरत असावे, असे निर्देश जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती दिशाच्या बैठकीत खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी आज दिले.
      जिल्हा नियोजन सभागृहात दिशा समितीची बैठक पार पडली, त्यावेळी खासदार श्री. पडोळे बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, माजी आमदार दिलीप बंसोड, अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी तानाजी सावंत,  उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग मंचावर उपस्थित होते. यासह पंचायत समितीचे सभापती, सदस्य, ग्रामपंचायत सरपंच व सर्व विभागाचे कार्यालय प्रमुख बैठकीस उपस्थित होते.
श्री. पडोळे पुढे म्हणाले, केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ सुलभरीत्या जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना मिळण्यासाठी  दिशा समिती गठीत करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या वतीने वेगवेगळया योजनांची  अंमलबजावणी केली जाते त्यात गती यावी,  असे ते यावेळी म्हणाले.
      खासदार श्री. पडोळे यांनी यावेळी, सर्वच महत्वपूर्ण योजनांचा आढावा घेतला. शेतकऱ्यांना मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजनेतंर्गत मिळणाऱ्या सौर ऊर्जा पंपाची स्थिती जिह्यातील स्थिती जाणुन घेतली.  जिल्ह्यातील वनक्षेत्रालगतचा काही भाग बफर झोन म्हणून सरकारने निश्चित केला असून स्थानिकांच्या पुर्नवसन करतांना शासनस्तरावरून स्थानिकांना कमी त्रास होईल, असे पहावे अशा सुचना केल्या. तसेच जिल्ह्यातील काही भागात वन्यजीव मानव संघर्षाचा त्रास स्थानिक लोकांना होत असून याबाबत यात नागरीकांचा जीवही जातो असे प्रकरणा हाताळतांना संवेदनशीलता दाखवावी असे ही श्री पडोळे म्हणाले. रानडुकर, हत्ती, माकड आणि अन्य वन्य जीवांमुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते याबाबत ही वन विभागाने योग्य ती पावले उचलावीत असे, निर्देशीत केले.  यासह जिल्ह्यात वनतारा सारखा एखादा प्रकल्प राबविण्यात यावा, यामुळे पर्यटन आणि रोजगारही वाढेल अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
जिल्हयातील क्रिडा विभागाकडे अपुरे मनुष्य बळ असल्याने कामांची प्रलंबितता वाढली आहे, याबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबतच्या सुचना दिल्या.  केंद्रातील अमृत तलाव योजनेचा लाभ संबधित विभागाने उचलावा यात केंद्राकडून निधी दिला जात असल्याने त्याचा लाभ नागरीकांना देण्यात यावा.
ज्या कलावंतांनी आजीवन कलेची सेवा केली आहे त्यांच्यासाठी  केंद्र शासनाची योजना असून त्याचा लाभ जिल्हयांतील कलावंतांना  मिळावा, यासदंर्भात लवकरच बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.
       आरोग्य विभागाविषयी बोलतांना श्री. पडोळे यांनी जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लांट विषयी माहिती जाणून घेतली. शासकीय रूग्णालयातील अडचणी जाणून घेतल्या. आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा, असे निर्देश यावेळी दिले.
       जिल्ह्यातील बहुसंख्य भाग आदिवासी लोकांचा असल्याने त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होणार नाही याबाबतच्या सूचना केल्या. रोजगार हमी योजनेचा थकीत निधी जिल्ह्यातील कुशल व अकुशल कामगारांना लवकरात लवकर मिळावा,रोजगार हमीची कामे मिळत नसल्यास त्याकाळात नियमाप्रमाणे बेरोजगार भत्ता देण्याबाबतचा विचार  व्हावा.
शेतकऱ्यांना खतासह कंपन्यांकडून अन्यबाबी आवश्यकता नसतानाही पुरविल्या जातात, याचा नाहक ताण शेतकऱ्यांचा होत असतो. याबाबत  पुरवठादार कंपन्यांवर कारवाई करण्याचे निर्देश श्री पडोळे यांनी बैठकीत दिले.
     शालेय पोषण आहारा अंतर्गत देण्यात येणारा आहार चांगल्या दर्जाचा असावा याची खातरजमा शिक्षण विभागाकडून व्हावी, यासह सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असावेत, कुठल्याही कारणाने विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पडू नये याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण याची माहिती यावेळी खासदार पडोळे यांनी जाणून घेतली.
       पणन विभागातर्फे धान खरेदी होत असून त्यामध्ये शेतकऱ्यांकडून येणाऱ्या तक्रारींचे निवारण जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी त्वरित करावेत. यावर्षी जिल्ह्याला रबीसाठी मिळालेल्या उद्दीष्टात वाढ करण्यात यावी. तसेच मागील वर्षीच्या धान अद्यापही गोदामात आहे. त्याबद्दलचा शेतकऱ्यांना मोबदला देण्यासंदर्भात पाठपूरावा करण्याचे निर्देश बैठकीत दिले.
  उमेदतर्फे जिल्ह्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती श्री पडोळे यांनी घेतील. यासह सर्वच विभागाबद्दलची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेऊन जिल्हयातील शेतकरी, महिला, बालक, विद्यार्थी, तरुण, वृद्ध, सर्वच स्तरातील  नागरीकांच्या येणाऱ्या समस्यांना सोडविण्यात दिंरगाई करू नये असे आवाहन खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी यावेळी केल्या.

blank