धाराशिव,दि.१७ जुलै – देशातील युवकांना राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी करून त्यांच्या नेतृत्वगुणांना चालना देण्याच्या उद्देशाने युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या ‘माय भारत’ (Mera Yuva Bharat) उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विशेष नोंदणी अभियानाला गुरुवारी १६ जुलै रोजी प्रारंभ झाला.
१ जुलै ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाद्वारे जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवतींना ‘माय भारत’ पोर्टलशी जोडून स्वयंसेवा, नेतृत्व विकास,कौशल्यविकास, अनुभवानिष्ठ शिक्षण तसेच विविध शासकीय उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गुरुवारी आढावा बैठक घेतली.या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
या अभियानादरम्यान जिल्ह्यातील महाविद्यालये,शाळा,युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था तसेच विविध शासकीय कार्यालयांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे.युवकांनी मोबाईल क्रमांक, ई-मेल आणि आवश्यक कागदपत्रांच्या सहाय्याने ‘माय भारत’ पोर्टलवर विनामूल्य नोंदणी करून शासनाच्या विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी केले.
युवकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंक अथवा क्यूआर कोडच्या माध्यमातूनही ‘माय भारत’ पोर्टलशी सहज जोडता येणार आहे.यासंदर्भातील सविस्तर माहिती पीपीटीच्या माध्यमातून ‘मेरा युवा भारत’ विभागाकडून बैठकीत सादर करण्यात आली.
‘माय भारत’ हा केवळ नोंदणीचा उपक्रम नसून युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला दिशा देणारा आणि समाजसेवेची संधी उपलब्ध करून देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.या माध्यमातून युवकांना स्वयंसेवा, सामाजिक बांधिलकी,नेतृत्व विकास,कौशल्यवृद्धी तसेच विविध शासकीय कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभागाची संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.
जिल्ह्यातील सर्व युवक-युवती, माय भारत,राष्ट्रीय सेवा योजना (NSS), एनसीसी (NCC), शैक्षणिक संस्था तसेच युवक संघटनांनी या विशेष नोंदणी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून अधिकाधिक युवकांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन मेरा युवा भारत,धाराशिव कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.





