तिरोडा : तालुक्यातील धापेवाडा उपसा सिंचन योजना धरणावर जॅकवेल तयार करून सदर पाणीउपसा करून करटी गावाजवळ खैरबंदा जलाशयातून १८ कि.मी.वर सोडण्यात येणार आहे. यासाठी १८ कि.मी. वर वितरण कुंड तयार करून खैरबंदा जलाशयाच्या माध्यमातून वितरण व्यवस्था हयातीत असलेल्या कालव्याच्या माध्यमातून १२ गावांना शेतीच्या सिंचनाकरिता पाणी दिले जाणार आहे. यासाठीच्या ३०० कोटी रुपयांच्या उपसा सिंचन योजनेला यांच्या आ. विजय रहांगडाले पाठपुराव्यानंतर शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे तालुक्यातील सिंचन क्षमतेत वाढ होऊन शेतकऱ्यांना मदत होणार आहे. खैरबंधा डाव्या कालव्याच्या टेल भागातील गावांना सिंचनाकरिता १२ ग्रामपंचायत कार्यालयांनी आ. विजय रहांगडाले यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-२अंतर्गत खैरबंधा तलावाच्या टेलवरील भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देण्याकरिता उपसा सिंचन योजनेच्या कामाचे सर्वेक्षण करण्याचे काम समाविष्ट करण्यात आले. त्या अनुषंगाने सविस्तर सर्वेक्षण करण्याचे काम करण्यात आले. धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा २अंतर्गत ९०,१४६ हेक्टर सिंचन क्षमता प्रस्तावित करण्यात आली होती. त्याकरिता खैरबंधा मध्यम प्रकल्पाच्या शेवटच्या भागातील गावांना पाणी मिळण्याकरिता धापेवाडा उपसा सिंचन योजना धरणावर जॅकवेल तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे बोरा, परसवाडा, बघोली, अर्जुनी, सावरा, पिपरिया, चांदोरी, खैरलांजी, बिहरीया, इंदोरा बु, करटी बु, करटी खुर्द या गार्वाना याचा लाभ होणार आहे. उपसा सिंचन योजनेद्वारा सिंचनाकरिता खरीप व रब्बी हंगामाकरिता पाणी देण्यात येणार असून, या योजनेतून कालव्याचे सिमेंटीकरण, नूतनीकरणाची कामे होणार आहेत. या कामाकरिता ३०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले असून, या कामामुळे २०१६ हेक्टर शेती ही सिंचनाखाली येणार आहे.





