४ ऑगस्टच्या यादीला ब्रेक; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय
मुंबई : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय राजवट संपून लवकरच लोकनियुक्त प्रतिनिधी येणार या आशेवर असलेल्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराश आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीला ऐनवेळी स्थगिती दिल्याने आगामी ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेमुळे आयोगाने हा निर्णय घेतला असून, ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याच्या शक्यतांवर आता पाणी फिरले आहे.
यापूर्वीच्या नियोजित वेळापत्रकानुसार ४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होऊन लगेचच निवडणुकीचे बिगुल वाजणार होते. या पार्श्वभूमीवर गावागावांत इच्छुक उमेदवारांनी बैठका, कॉर्नर सभा, मतदार संपर्क आणि पॅनेल बांधणीच्या हालचाली तीव्र केल्या होत्या. मात्र, मतदार याद्या दोषमुक्त आणि पारदर्शक करण्यासाठी सध्या राबवण्यात येत असलेली ‘एसआयआर’ मोहीम पूर्ण झाल्यानंतरच अद्ययावत विधानसभा मतदारसंघ निहाय यादी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वापरली जावी, अशी विनंती निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.
आयोगाने ४ ऑगस्टच्या प्रसिद्धीला दिलेल्या स्थगितीमुळे सुमारे ७५४ ग्रामपंचायतींसह राज्यातील मुदत संपलेल्या सर्वच ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया काही काळासाठी पुढे ढकलली गेली आहे. मात्र, या निर्णयामुळे मतदार यादीतील मयत, दुबार, स्थलांतरित आणि बोगस मतदारांची नावे वगळून पूर्णपणे अद्ययावत व पारदर्शक यादी हाती येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे ग्रामीण भागातील राजकीय गणिते आणि मतांची जुळवाजुळव पूर्णपणे बदलणार आहे.
नव्या वेळापत्रकाची प्रतीक्षा
अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज स्वीकारणे, छाननी, चिन्ह वाटप आणि प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडणार होती. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विकासकामांच्या भूमिपूजनांचा धडाका सुरू असतानाच आता या निर्णयामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय वातावरण पुन्हा ‘वेट अँड वॉच’ मोडवर गेले आहे. अतिवृष्टी आणि सणासुदीच्या काळासोबतच आता ‘एसआयआर’ मोहिमेची भर पडल्याने, नवीन अद्ययावत मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच राज्य निवडणूक आयोग निवडणुकांचे नवे वेळापत्रक जाहीर करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.





