आमगाव:महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने सालेकसा रोड येथील साई मंगलम लॉन येथे आयोजित ‘शेतकरी शेतमजूर हक्क परिषद’ तथा गोंदिया जिल्हा किसान काँग्रेस मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मेळाव्यात जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येऊन त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सर्व शक्तीनिशी आवाज बुलंद करण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पाटे हे होते.
मेळाव्यात शेतीमालाला योग्य भाव न मिळणे, शेतीचा वाढता उत्पादन खर्च, सिंचन व विजेचा अपुरा पुरवठा, अवकाळी व नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान, शेतमजुरांचे रोजगार आणि विविध हक्कांच्या प्रश्नांवर नेत्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
“शेतकरी व शेतमजुरांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक गावात संघटन मजबूत करणे गरजेचे आहे. सर्व घटकांनी एकजुटीने संघर्ष केल्यास सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेणे भाग पडेल.”— मा. नानाभाऊ पटोले, आमदार व माजी प्रदेशाध्यक्ष, म.प्र.काँ.क.
या मेळाव्याला काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमरभाऊ वराडे, माजी आमदार दिलीप बनसोड , आमदार अभिजित वंजारी,जिल्हा किसान आघाडी अध्यक्ष जितेश राणे,पी.जी.कटरे यांच्यासह किसान काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रमुख उपस्थित होते.तसेच महिला शक्तीचे नेतृत्व करत जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा वंदना काळे, माजी जि.प. अध्यक्षा उषाताई मेंढे, माजी महिला जिल्हाध्यक्ष उषाताई शहारे, जिल्हा परिषद सदस्य विमल कटरे, गीता लिल्लारे, छाया नागपुरे व सभापती विनाताई काठोर यांची विशेष उपस्थिती लाभली.या मेळाव्यास गोंदिया जिल्ह्यातील किसान काँग्रेसचे पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, काँग्रेस पक्षाचे सर्व धुरंधर नेते, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




