27.1 C
Gondiā
Wednesday, September 9, 2026
Home विदर्भ स्वच्छ वायू दिनानिमित्त चंद्रपूर शहरात भव्य सायकल रॅली

स्वच्छ वायू दिनानिमित्त चंद्रपूर शहरात भव्य सायकल रॅली

0
14
‘स्वच्छ हवा – निरोगी जीवन’चा संदेश देत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
चंद्रपूर : राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम (NCAP) अंतर्गत स्वच्छ वायू दिनानिमित्त चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आज जनजागृतीपर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मा. महापौर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नागरिकांना स्वच्छ हवा, पर्यावरण संवर्धन व वायू प्रदूषण नियंत्रणाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमास महानगरपालिका आयुक्त अकुनूरी नरेश , उपायुक्त संदीप चिद्रवार, सहाय्यक आयुक्त श्रीमती शुभांगी सूर्यवंशी, पंचबुद्धे सर, अमोल शेळके, संतोष गार्गेलवार, सौ. कुशल देशमुख तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

स्वच्छ वायू दिनाचे औचित्य साधून खालसा स्कूलमधील विद्यार्थी तसेच चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सहभागातून भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सायकल रॅलीद्वारे शहरातील नागरिकांमध्ये वायू प्रदूषण कमी करण्याबाबत जनजागृती केली. पर्यावरणपूरक वाहतुकीचा अवलंब, सायकलचा अधिकाधिक वापर, वृक्षारोपण, कचरा न जाळणे तसेच वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करण्याचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.“सायकल चालवा, प्रदूषण टाळा”, “स्वच्छ हवा – निरोगी जीवन”, “वायू प्रदूषण कमी करूया – चंद्रपूर निरोगी बनवूया” अशा संदेशांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शहरातील वायू प्रदूषण कमी करून नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देणे हा आहे. यासाठी महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना तसेच जनजागृतीपर कार्यक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.शहरातील वाढते वायू प्रदूषण कमी करण्यासाठी नागरिकांनी शक्य तितका सायकलचा वापर करावा, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्यावे, अनावश्यक वाहनांचा वापर टाळावा, परिसरात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करावे तसेच कचरा उघड्यावर जाळू नये, असे आवाहन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सायकल रॅलीला विशेष स्वरूप प्राप्त झाले. स्वच्छ वायू आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांनी शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचवित “स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त चंद्रपूर”चा संकल्प व्यक्त केला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.