लातूर, दि. ११ : अहमदपूर येथील लांजी परिसरातील खरीप पीक परिस्थितीची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांकडून पिकांबाबत माहिती घेतली.
अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्ज्वला पांगारकर, तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे, गट विकास अधिकारी पंकज शेळके यांच्यासह संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या पाहणी दौऱ्यादरम्यान सहकार मंत्री श्री. पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि कृषी विभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांनाकडून अहमदपूर तालुक्यातील पीक परिस्थितीची माहिती घेतली. नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी काळजी करू नये, राज्य सरकार संपूर्ण संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच चाकूर तालुक्यातील पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून याबाबत आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.





