नवी दिल्ली, दि. 8 – मणिपूर विधानसभा निवडणुकीचा दुसरा आणि अंतिम टप्पा संपल्यानंतर बॉम्बस्फोट झाला आहे. राज्याची राजधानी इन्फाळमध्ये संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान हा बॉम्बस्फोट झाला असून, यात 8 जण जखमी झाले आहेत. बॉम्बस्फोटात काही जण गंभीर आहेत. बॉम्बस्फोट कस्तुरी पुलाजवळील एका मेडिकलच्या दुकानात झाला आहे.
जखमींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे आजच राज्य विधानसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा होता. मात्र इन्फाळमध्ये मतदान हे 4 मार्च रोजी झालं आहे. राज्यात गेल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात मतदान झालं होतं. 4 मार्चच्या टप्प्यात सरासरी 84 टक्के मतदान झालं होतं, तर आजच्या टप्प्यात 86 टक्के मतदान झालं आहे. पाच राज्यांमध्ये मणिपूर सरासरी मतदानाच्या तुलनेत सर्वात पुढे आहे. सहाव्या टप्प्यातील विधानसभेच्या 49 जागांसाठी उत्तर प्रदेशात 57 टक्के मतदान झाले तर, मणिपूरमध्ये विधानसभेच्या 38 जागांसाठी तब्बल 84 टक्के मतदान झाले. मणिपूर विधानसभेसाठी कडेकोट बंदोबस्तात मतदान झालं आहे.





