
- कृषि विभागाचे आवाहन
- कारवाईचा इशारा
वाशिम, दि. ११ : मागील दोन वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यात किटकनाशके फवारणीमुळे विषबाधा होवून शेतकरी व शेतमजूर यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. प्रामुख्याने प्रेाफेनोफॉस आणि सायपरमेथ्रीन, मोनोक्रोटोफॉस व डायफेन्थुरॉन या कीटकनाशकाच्या मिश्रणामुळे मृत्यु झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यातही याच कीटकनाशकाच्या विषबाधेमुळे सध्या शेतकरी व शेतमजूर दवाखान्यामध्ये दाखल होत असल्याचे सकृतदर्शनी दिसून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्रचालकांनी व लाल त्रिकोण असलेल्या अत्यंत विषारी व मानवी आरोग्यास हानिकारक असलेल्या किटकनाशकांची विक्री टाळावी, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
कृषि सेवा केंद्रांनी हिरवे त्रिकोण व निळा त्रिकोण असलेल्या कमी विषारी किटकनाशके विक्रीस प्राधान्य द्यावे. शेतकरी व शेतमजूरांना विषबाधा होऊ नये, याकरिता त्यांना जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्रांनी प्रोफेनोफॉस आणि सायपरमेथ्रीन, मानोक्रोटोफॉस व डायफेन्थुरॉन या किटकनाशकांच्या वापरापासून परावृत्त करावे. तसेच आपल्या कृषि सेवा केंद्रामधून याची विक्री करू नये. अशा अपघातात किंवा विषबाधेच्या प्रकरणात कृषि सेवा केंद्राचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, असे निदर्शनास आल्यास किटकनाशके कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.




