वर्धा,दि.26: महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त काँग्रेसने २ ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशभर पदयात्रेचे आयोजन केले असून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या दिल्लीतील पदयात्रेत सहभागी होणार आहेत. तर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी २ ऑक्टोबर रोजी वर्ध्यातून निघणाऱ्या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. या पदयात्रेद्वारे राहुल गांधी पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात नव्या दमाने उतरताना दिसणार आहेत. राज्यात विधानसभा निवडणुका असल्याने राहुल गांधी वर्ध्यात येणार असल्याने काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे.२ ऑक्टोबर रोजी वर्ध्यातून निघणाऱ्या पदयात्रेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, अखिल भारतीय काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष लालजी देसाई, महाराष्ट्र सेवादलाचे प्रभारी मंगलसिंग सोळंकी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे यांच्यासह प्रमुख नेते व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ही पदयात्रा सकाळी १० वाजता बापू कुटी, सेवाग्राम आश्रम परिसर येथून सुरू होईल आणि हुतात्मा स्मारक, आदर्शनगर येथे या यात्रेचा समारोप होईल. पदयात्रा संपल्यानंतर सेवाग्राम रोडवरील रत्नाकर सभागृहात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे.





