भंडारा ,दि.31 : :: ऐन दिवाळीत २५ ते २६ ऑक्टोबरला जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे धान पाण्यात बुडाले आहेत. धानाला कोंब आलेले असूनसुद्धा सरकारकडून त्याचे सर्वेक्षण व पंचनामे करायला हवे होते; मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून सत्तेसाठी भाजप व शिवसेना बोक्यासारखे भांंडत आहेत, अशी तिखट प्रतिक्रिया नवनिर्वाचित आमदार नाना पटोले यांनी शासकीय विश्रामभवनात आयोजित पत्रपरिषदेत दिली.पत्र परिषदत बीडीसीसी बॅंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, उपाध्यक्ष सदाशिव वलथरे उपस्थित होते..
सरकारला अजून किती शेतकऱ्यांची आत्महत्या पाहिजे आहे. सरकार धान खरेदीसाठी आता शेतकऱ्यांना विचारत आहे. माझी जात व धर्म शेतकरीच आहे. त्यामुळे मी सरकारला विनंती करतो की त्यांनी त्वरित धान पिकाचे पंचनामे करून सरसकट एकरी १५ हजार रुपये द्यावे व त्यांच्यावर असलेले बॅंकेचे पूर्ण कर्ज माफ करून व पीक विम्याची जाचक अट रद्द करून पीकविम्याचे पैसे त्वरित द्यावे. व्यापाऱ्यांना सूट देण्यासाठी सरकारने तिजोरी खुली केली. आता देशाच्या अन्नदाता शेतकऱ्यांसाठी आपली तिजोरी खुली करायला पाहिजे असे विचार आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केले.





