
वाशिम, दि. ०२ : बुलडाणा जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे पाण्याची आवक पाहून बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग वाढवला अथवा कमी केला जात आहे. तसेच पैनगंगा नदीच्या वरील बाजूस असलेला बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी मध्यम प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरला असून त्यामधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पैनगंगा नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे.नदीपात्रात पाण्याची आवक वाढल्यास वाशिम जिल्ह्यात पैनगंगा नदीवर असलेल्या ११ बॅरेजचे दरवाजे कोणत्याही वेळी उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागण्याची शक्यता आहे. तरी पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात जावू नये, अथवा आपली जनावरे नदीपात्रात सोडू नयेत, असा इशारा वाशिम पाटबंधारे विभागाने दिला आहे.




