सांगली,दि.15(विशेष प्रतिनिधी) – राज्यात काँग्रेस -राष्ट्रवादी- शिवसेना एकत्र येवून सरकार स्थापन करण्यासाठी महाशिवआघाडी झाली असून ही अधिकृत घोषणा होण्यापूर्वी महाशिवआघाडीत एकोपा वाढत असल्याचे चित्र आहे.परतीच्या पावसाने राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्वच पक्षाचे प्रमुख नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी गेले. तर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज सांगली जिल्ह्याला भेट देत नेवरी गावातील शेतीच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. यावेळी काँग्रेस नेते आणि पलूस-कडेगाव मतदार संघाचे आमदार विश्वजीत कदम आवर्जुन उपस्थित होते.या पार्श्वभूमीवर उभय पक्षातील नेते आतापासूनच एकमेकांशी जुळवून घेण्याच्या तयारीत लागले आहे. यात काँग्रेस सर्वात पुढे दिसत असून उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान कदम यांनी आवर्जुन उपस्थिती लावली होती.दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना यांच्यातील आघाडीची बोलणी जोरात सुरू आहे. तसेच निर्णय सकारात्मक होण्याची शक्यता आहे.





