
नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.02- देवेंद्र फडणवीस हे 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी केंद्राचे 40 हजार कोटी रुपये वाचवले, असा खळबळजनक दावा भाजपचे विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणे ही एक चाल होती, असेही ते म्हणाले.
अनंत कुमार म्हणाले, “सर्वांना माहित आहे की महाराष्ट्रात आमचा माणूस 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाला. त्यानंतर फडणवीसांनी राजीनामा दिला. त्यांनी हे सर्व नाटक कशासाठी केले? आमच्याकडे बहुमत नाही हे आम्हाला माहित नव्हते का? तरीही ते मुख्यमंत्री का झाले? हा तोच प्रश्न आहे जो सर्वजण विचारत आहेत. मुख्यमंत्र्यांकडे जवळपास 40 हजार कोटी रुपयांचा केंद्राचा निधी होता. जर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेत आले असते, तर त्यांनी या 40 हजार कोटी रुपयांचा दुरुपयोग केला असता. त्यामुळेच फडणवीसांनी 80 तास मुख्यमंत्रिपदावर येऊन 15 तासाच्या आत केंद्राचा हा निधी परत पाठवला आणि केंद्राचं नुकसान होण्यापासून वाचलं,” असा गौप्यस्फोट अनंतकुमार हेगडे यांनी केला.
“इतकेच नाही तर भाजपने हा प्लॅन खूप आधीपासून आखला होता. यासाठीच एक नाटक रचावं लागंल. ते सगळे नाटके पूर्वनियोजित होते, त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर फडणवीसांनी 15 तासात 40 हजार कोटी रुपये तिकडे पाठवले, जिथून ते आले होते. अशाप्रकारे फडणवीसांनी केंद्र सरकारचा पैसा वाचवला”, असा दावाही अनंतकुमार यांनी केला.




