चंद्रपूर,दि.03ः-भारतातील ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना व्हावी यासाठी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघाचे चिमूर तालुका कोषाध्यक्ष कवडु लोहकरे यांनी स्वत:च्या रक्ताने निवेदन लिहिले आहे. हे निवेदन राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आले आहे.रक्ताने लिहिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, 1931 पासून ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात आलेली नाही. त्यामुळे सन 2021 या वर्षात नव्यानं जनगणना करण्यात येत आहे. पण ओबीसी समाजासाठी जनगणनेत स्वतंत्र कलम नसल्यामुळे पुन्हा एकदा ओबीसी समाजाचे शोषण केले जात आहे. शासनाकडून ओबीसी समाजाला भूलथापा दिल्या जात आहेत.महाराष्ट्र विधानसभेत जनगणनेबाबत ठराव संमत करण्यात आला. परंतु हाच ठराव केंद्रात संमत होणे गरजेचे आहे. 52 टक्के ओबीसी समाज असताना फक्त 19 टक्के ओबीसींना आरक्षण दिले जात आहे. हा ओबीसी समाजावर मोठा अन्याय असून, आपण ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे.





