29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home महाराष्ट्र जिल्हा परिषदेतील वादग्रस्त खरेदीबाबत राज्य शासनाकडून चौकशी समिती नियुक्त

जिल्हा परिषदेतील वादग्रस्त खरेदीबाबत राज्य शासनाकडून चौकशी समिती नियुक्त

0
257

blank

कोल्हापूर,दि.18ः जिल्हा परिषदेमध्ये वादग्रस्त ठरलेल्या वॉटर एटीएम, घनकचरा व्यवस्थापनासाठी कचरा मशीन खरेदी व वित्त आयोगाच्या निधी आराखड्याचे उल्लंघन करून करण्यात आलेला खरेदीचा व्यवहार, याची चौकशी करण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने गुरुवारी घेतला आहे. याकरिता ग्रामविकास मंत्रालयाचे उपसचिव उदय जाधव यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आले आहे.

ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने नियुक्त झालेल्या या समितीमुळे जिल्हा परिषदेतील संभाव्य गैरव्यवहार चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेचा कारभार नेहमीच वादग्रस्त झाला आहे. त्यातील वॉटर एटीएम खरेदी, घनकचरा व्यवस्थापनासाठी कचरा मशीन खरेदी आणि वित्त आयोगाच्या निधी आराखड्याच्या मर्यादेचे उल्लंघन करून करण्यात आलेली खरेदी यावरून गेले अनेक दिवस सातत्याने वाद सुरू आहे.

याबाबत ग्रामविकास मंत्र्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन आता उदय जाधव यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केलेल्या कामाची चौकशी करावी आणि याबाबतचा सविस्तर अहवाल शासनाला तातडीने सादर करावा, असे शासन निर्देश आज देण्यात आले आहे. याबाबत शासनाचे ग्राम विकास विभागाचे उपसचिव एकनाथ गागरे यांच्या स्वाक्षरीचे पत्र कोल्हापूर जिल्हा परिषदेला पाठवण्यात आले आहे.

blank