चंद्रपुरात जलसंधारण विभागाच्या 3 अधिकाऱ्यांना अटक

0
57

चंद्रपूर,दि.04ः येथील प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी, विभागीय लेखाधिकारी व नागपूर येथील प्रादेशिक जलसंधारण अधिकारी यांना तब्बल 50 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. मागील आठवड्यापासून चंद्रपूर जिल्हा लाच प्रकरणामुळे चर्चेत असून,राजुरा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील दोन शिपायांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी जलसंधारण विभागाने कोट्यवधी रुपये खर्च करून कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती केली होती. त्या कामाचे देयक मंजूर करण्यासाठी कंत्रादारांकडून तब्बल 81 लाख रुपयाची लाचेच्या स्वरूपात मागणी केली. तडजोडीनंतर पहिल्या टप्प्यात 50 लाख रुपयांची रक्कम देण्याचे मान्य करण्यात आले. मात्र, लाच देण्याची मानसिकता नसल्यामुळे संबंधितांनी लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कोल्हापूरी बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचे केलेल्या कामाच्या वितरित केलेल्या देयकाकरिता व उर्वरित रक्कम वितरित करण्याकरिता 50 लाखाची लाच घेतल्याप्रकरणी जलसंधारण कार्यालय चंद्रपूर येथील 2 अधिकाऱ्यांना अटक केली.ही कारवाई नागपूर येथे मंगळवारी रात्री उशिरा करण्यात आली. दरम्यान, या कारवाईत नागपूरच्या एका अधिकाऱ्यालासुद्धा अटक करण्यात आली
असून एकूण 3 आरोपी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीमधे चंद्रपूरपूचे
प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रावण शेंडे, नागपूरपूचे जिल्हा जलसंधारण अधिकारी कविजीत पाटील, चंद्रपुरातील विभागीय लेखाधिकारी रोहीत गौतम यांचा समावेश आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक अनामिका मिर्झापूरे यांनी केली.