महिलेसह दोन लहान मुलींचा पैनगंगा नदीत बूडून मृत्यू

0
3

यवतमाळ : आर्णी तालुक्यातील कवठा बाजार येथे एकाच कुटुंबातील तिघांचा पैनगंगा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये एक महिला आणि दोन लहान मुलींचा समावेश आहे. ही घटना आज सायंकाळी पाच वाजतादरम्यान घडली. प्रतीक्षा प्रवीण चौधरी (३६), अक्षरा नीलेश चौधरी (११) आणि आराध्या निलेश चौधरी (९) अशी मृतांची नावे आहेत.

कवठा बाजार येथील चौधरी कुटुंबातील महिला पैनगंगा नदीपात्रात बेलफूल अर्पण करण्यासाठी गेल्या होत्या. प्रतीक्षा यांच्यासह जया नीलेश चौधरी, रेणू नीलेश चौधरी, अक्षरा नीलेश चोधरी, आराध्या नीलेश चौधरी या सर्व नदीपात्रात उतरल्या. मात्र, पात्रात रेती उपसा केल्याने खड्डेच खड्डे आहेत. नदीतपात्राच्या काठावरील खड्डा आणि त्यातील पाण्याचा अंदाज या महिलांना आला नाही. प्रतीक्षा, अक्षरा आणि आराध्या या खड्ड्यात पडल्या. मुलींची आई जया नीलेश चौधरी व मोठी बहीण रेणू यांनी तिघिंनाही पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. तिघीही पुतण्या पाण्यात बुडाल्या.

घटनेची माहिती मिळताच आर्णी पोलीस ठाण्याचे निरीक्षक केशव ठाकरे, उपनिरिक्षक स्वाती वानखडे, जमादार सतिश चौधार, अशोक टेकाळे, नफीस शेख, विशाल गावंडे हे घटनास्थळी दाखल झाले. अवैध वाळू उपशामुळे या तिघींचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांसह ग्रामस्थांनी केला. आर्णीचे तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत हे अधिकारी घटनास्थळावर येणार नाही, तोपर्यंत तिन्ही मृतदेहाला हात लावू देणार नाही, अशी भूमिका घेतली. वृत्तलिहीपर्यंत या प्रकरणी तक्रार दाखल झाली नव्हती. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.